Personality Development
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे आणि चंगळवादाचंही आहे. तांत्रिक प्रगतीबरोबर येणारे सारे मोह इथे आहेत. या काळात यशस्वी व्हायचं आहे आणि मोहमयी वातावरणात विवेकानं मनावर ताबाही ठेवायचा आहे. अशा स्पर्धेच्या युगात म्हणूनच ताणतणाव अपरिहार्य आहेत. त्यांना तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणं महत्त्वाचं ठरतं. आसपास निर्माण होत राहणाऱ्या मोहाच्या, चंगळवादी गोष्टी आपल्याला सुख देऊ शकतात का याचं विश्लेषण करता यायला हवं. चकाकते ते सगळे सोने नसते हे जाणवायला हवं. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्त्व विकास असा व्हायला हवा की, त्यात कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत मन शांत, स्थिर, कणखर आणि आनंदी असायला हवं. मनाची अशी जडणघडण बनवणं आता शक्य आहे. म्हणजेच मनाचं ‘सकारात्मक प्रोग्रॅमिंग’ शक्य आहे. त्यासाठी आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे.