जगण्याची प्रेरणा देणारे सप्तर्षी आणि अरुंधती

आपल्याला कधी आजारपण आलं आणि त्यामुळे अंथरुणावर पडून राहावं लागलं, की मनात अस्वस्थता निर्माण होते.
जगण्याची प्रेरणा देणारे सप्तर्षी आणि अरुंधती
जगण्याची प्रेरणा देणारे सप्तर्षी आणि अरुंधतीsakal
Updated on

आपल्याला कधी आजारपण आलं आणि त्यामुळे अंथरुणावर पडून राहावं लागलं, की मनात अस्वस्थता निर्माण होते. आजारपणाच्या वेदनांबरोबरच आपण कुठे जाऊ शकत नाही, मनमोकळी हालचाल करू शकत नाही या जाणिवेने अधिक त्रास होतो. या अशा अवस्थेत काही काही करू नये असं वाटतं, पण हे असं आजारपण, त्यात भर म्हणून दारिद्र्य आणि त्याच्यासोबत येणारी समाजाची अवहेलना अशा प्रतिकूल परिस्थितीचा अनुभवत घेत काही अवलियांनी साहित्य क्षेत्रात आपल्या लेखनाचा वेगळा ठसा उमटविला आहे. या प्रतिभावंतांची प्रेरणादायी चरितकथा सुमती देवस्थळे यांनी ‘सप्तर्षी आणि अरुंधती’ या पुस्तकात सांगितली आहे.

सर्वप्रथम या पुस्तकाचं नावच आपल्याला आकर्षित करून घेतं. आपल्या संस्कृतीत सात ऋषी आणि अरुंधती ही ब्रह्मवादिनी आकाशस्थ राहून तप करतात अशी मान्यता आहे. त्यांच्या तपानं सृष्टीचं कल्याण होतं, अशी अनेकांची श्रद्धा आहे. हाच धागा पकडून साहित्यिक्षितिजावर एखाद्या तपस्वी ऋषींप्रमाणे शारीरिक कष्ट सोसत आपल्या प्रतिभेनं तळपणाऱ्या आठ जणांचं संक्षिप्त, पण अगदी नेमकेपणानं मांडलेलं चरित्र या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळणार आहे. एमिली ब्राँटे, अलेक्झांडर पुष्किन, फिओडोर डोस्टेव्हस्की, निकोलाय गोगोल, एमिल झोला, गी द मोपासा, ओनेरे द बाल्झाक आणि अँटन चेकॉव्ह ही ती जगावेगळी व्यक्तिमत्वे. जीवनात डोळ्यांसमोर संपूर्ण अंधार असताना आणि शरीर पुरेसे साथ देत नसताना निराशेच्या गर्तेत जाण्याऐवजी या आठही जणांनी स्वतःच्या प्रतिभेने केवळ स्वतःच्या आयुष्यात नव्हे, तर सर्व मानवजातीच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचा प्रयत्न केला.

अगदी वानगीदाखल सांगायचं झाल्यास क्षयरोगानं ग्रासलेलं शरीर, घरी असलेलं अठराविश्व दारिद्र्य आणि अवघ्या तीस वर्षांचं आयुष्य एवढ्या भांडवलावर एमिली ब्राँटे या लेखिकेने एक कादंबरी आणि काही कविता लिहून जागतिक साहित्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिनं लिहिलेली ‘वुदरिंग हाइट्स’ ही कादंबरी आजही जागतिक साहित्यक्षेत्रात अग्रगण्य मानली जाते. तिचा जीवनसंघर्ष एखाद्या कादंबरीचा विषय ठरावा असाच आहे. हा संघर्ष लेखिकेने अगदी नेमकेपणाने शब्दबद्ध केला आहे. एमिलीप्रमाणे या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वच लेखकांचं चरित्र अंगावर शहारा आणणारं आणि नकळत डोळ्यांत पाणी आणणारं आहे. मात्र, याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीची परमोच्च अवस्था असतानादेखील हार न मानता त्यातून काही तरी सर्जनशील घडवण्याची प्रेरणा या लेखकांच्या जीवनचरित्रातून मिळते. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी निराश होणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य माणसांना हे लेखक त्यांची दुःख विसरून धीर देतात, जगण्याची उमेद देतात आणि हे सुंदर आयुष्य विनातक्रार जगण्याचा कानमंत्रसुद्धा देतात.

(संकलन : रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.