

Students exploring the interconnectedness of different subjects through integrated education.
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
महानुभाव साहित्यातील हत्ती आणि चार आंधळ्यांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असेलच! एका गावात चार मित्र राहत होते. त्यांनी पूर्वी कधीही हत्ती पाहिला नव्हता. एके दिवशी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून हत्तीच्या भोवताली त्यांना सोडून दिले व काय आहे ते ओळखायला सांगितले. पहिला आंधळा हत्तीच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो, ‘‘हा खांब आहे.’’ दुसरा आंधळा हत्तीच्या सोंडेला हात लावतो आणि म्हणतो, ‘‘नाही, जाड दोरखंड किंवा अजगर आहे.’’ तिसरा आंधळा हत्तीच्या कानाला स्पर्श करतो आणि म्हणतो, ‘‘तुम्ही दोघेही चुकत आहात. हे तर सूप आहे.’’ चौथा आंधळा हत्तीच्या शेपटीला हात लावतो आणि म्हणतो, ‘‘नाही, हा झाडू किंवा दोरी आहे.’’ यानंतर चौघांमध्ये जोरदार वाद सुरू होतो. प्रत्येकाला वाटत होते की फक्त त्याचेच म्हणणे बरोबर आहे. थोड्या वेळाने डोळ्यांवरची पट्टी काढल्यानंतर सर्वजण हत्ती पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की प्रत्येकाने हत्तीच्या फक्त एकाच भागाला स्पर्श केला. त्यामुळे हत्तीचे संपूर्ण स्वरूप समजले नाही. सत्य समजून घ्यायचे असेल, तर सर्व बाजू जाणून घेणे आवश्यक असते. शिक्षणाचेही असेच झाले आहे. तुकड्या तुकड्यात शिकल्याने ज्ञानाचा संपूर्ण हत्ती समजत नाही. म्हणूनच एकात्मिक शिक्षणाची आवश्यकता आहे. वास्तविक जीवनातल्या समस्या विषयानुसार येत नाहीत.