तांत्रिक कौशल्ये आत्मसात करताना...

Job_opportunity
Job_opportunity
Updated on

कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्यांकडून कंपनीला चांगल्या तांत्रिक कौशल्यांची अपेक्षा असते. खऱ्या अर्थाने उत्तम अभियंता कोणाला म्हणता येईल? ज्या विद्यार्थ्यांना कंपनीतील तांत्रिक अडचणींवर कमी खर्चात उत्तम तांत्रिक गुणवत्तेचे उपाय कमी वेळात देतील, त्यांना उत्तम अभियंता म्हणायला हवे.

विद्यार्थ्यांना मूलभूत सैद्धांतिक संकल्पनांबरोबर उपलब्ध ज्ञानाचा वापर करून समस्या सोडविण्यासाठी लागणारी माहिती चांगली असायला हवे. उद्योग जगतातील लोकांकडून विद्यार्थ्यांविषयी अभिप्राय मिळतात. त्यात एक चांगला अभिप्राय असतो, तो म्हणजे विद्यार्थ्यांचे सैद्धांतिक ज्ञान चांगले आहे. मात्र त्याच वेळी मिळणारा आणखी एक अभिप्राय म्हणजे ज्ञान वापरण्याची क्षमता कमी असणे. 

बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान व ते वापरण्याचे कौशल्य उत्तमरीत्या वाढविणे आवश्‍यक आहे. प्रगत राष्ट्रांत सैद्धांतिक ज्ञानावर साधारणपणे ३० ते ४o टक्के भर दिला जातो. त्याचा वापर व व्यावहारिक ज्ञानावर त्यापेक्षा जास्त म्हणजे, साधारणपणे ६० ते ७० टक्के भर दिला जातो. मात्र भारतातील बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांमध्ये आजही ६० ते ७० टक्के भर सैद्धांतिक ज्ञानावरच दिला जातो. हे चित्र आपल्याला बदलायला हवे. विद्यार्थी व्यावहारिक ज्ञान जास्तीत जास्त कसा घेईल त्यादृष्टीने परीक्षा पद्धती तसेच अभ्यासक्रमातही पूरक बदल करायला हवेत. यासाठी प्रामुख्याने उद्योग जगताची मदत घ्यायला हवी. आजची परिस्थिती बघितल्यास उद्योगातील बरेचशे प्रतिनिधी आपले व्यावहारिक ज्ञान व अनुभव विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देण्यासाठी तयार आहेत.

प्रोजेक्टमधून प्रत्यक्ष ज्ञान खूप चांगले विकसित होते. आपल्याकडे अभियांत्रिकी व इतर कोर्सेसमध्ये देखील विद्यार्थी पदवीच्या ३ ते ४ वर्षांत साधारण एक किंवा दोन प्रोजेक्ट करतात. मात्र जगातील प्रगत महाविद्यालयांत काही ठिकाणी प्रत्येक वर्षाला एक प्रोजेक्ट (पदवीपर्यंत ३ ते ४) किंवा प्रत्येक सत्रात एक प्रोजेक्ट (पदवीपर्यंत ६ ते ८) प्रोजेक्ट केले जातात. अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही विद्यार्थ्यांनी स्वतःहून जास्तीत जास्त प्रोजेक्ट करायला हवेत.

व्यावहारिक ज्ञान वाढविण्याचा सर्वांत उत्तम उपाय म्हणजे विद्यार्थ्याने कंपनीत इंटर्नशिप करणे. अशा विद्यार्थ्यांपैकी चांगली कामगिरी असणाऱ्या ५० ते  ६० टक्के विद्यार्थ्यांना ती कंपनीच नंतर नोकरी देते. विविध अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून कंपन्या नवनवीन वस्तू व उत्पादन कसे बनवितात, याचे खूप चांगले ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करताना मिळतो.

आजकाल बऱ्याचशा कंपन्या हॅकेथॉन किंवा इतर तांत्रिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देण्याचे काम करतात. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, KPIT Sparkle, TCS Enginex, Codevita, HackWithInfy यांसारख्या स्पर्धांमध्ये एखाद्या विषयावरील प्रोजेक्ट स्पर्धेतून देशभरातील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कल्पनांतून नवनिर्मितीसाठी प्रवृत्त केले जाते. देशभरातील हजारो विद्यार्थी आपले प्रोजेक्ट्स व समस्यांवरील उपाय सुचवितात. यातील बऱ्याचशा कंपन्या शेकडो विजेत्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची बक्षिसे व नोकऱ्या देखील देतात. Techfest, Rendezvous, OASIS यांसारख्या स्पर्धांमधून देखील विद्यार्थ्यांना खूप शिकायला मिळते.

काही चांगल्या ऑनलाइन व ऑफलाइन कोर्सेसमधून तांत्रिक कौशल्ये वाढविता येतात. बरेच विद्यार्थी रिसर्च पेपर उच्चप्रतीच्या तांत्रिक नियतकालिकांतून प्रकाशित करतात. अशा प्रकारचे पेपर्स तयार करताना देखील विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान चांगल्यापैकी वाढते. प्रत्येक विद्यार्थ्याने पदवी पूर्ण करेपर्यंत किमान दोन रिसर्च पेपर्स प्रकाशित केल्यास त्याचा त्यांना चांगला फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

CET Percentile Row Should Students Be Judged by Their Class 12 Marks
Maharashtra Teacher Recruitment 2026
Maharashtra primary teacher promotion stayed
India Post Staff Car Driver Recruitment: Class 10 Pass Govt Job For Central Employees
Marathi News Esakal
www.esakal.com