‘लक्ष्य’भेद : नोटस् तयार करण्याची पद्धत..

‘यूपीएससी’ आणि ‘एमपीएससी’च्या अभ्यास कसा करायचा याला क्रमिक आणि अभ्यासाच्या पुस्तकांचं वाचन हे एक उत्तर आहे, तसंच त्या उत्तराचा अजून एक भाग आहे तो म्हणजे नोट्स काढणं.
UPSC and MPSC Study
UPSC and MPSC StudySakal

- सोनल सोनकवडे

‘यूपीएससी’ आणि ‘एमपीएससी’च्या अभ्यास कसा करायचा याला क्रमिक आणि अभ्यासाच्या पुस्तकांचं वाचन हे एक उत्तर आहे, तसंच त्या उत्तराचा अजून एक भाग आहे तो म्हणजे नोट्स काढणं. या अभ्यासक्रमाची व्याप्ती लक्षात घेता परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज बांधून त्यांच्या नोट्स काढणं अत्यंत आवश्यक असतं. या नोट्स काढताना खालील काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.

काही विद्यार्थी शिक्षक एखादा विषय शिकवत असताना लगेच तिथल्या तिथे त्या विषयाच्या नोट्स काढतात. यामध्ये प्रामुख्याने ते वक्ता, शिक्षक बोलत असताना महत्त्वाची माहिती थोडक्यात लिहून घेतात. त्याचाही काही जणांना फायदा होतो. परंतु आपण येथे तुमची अभ्यासाची पुस्तकं अधिक सखोलपणे वाचून, त्या त्या विषयातल्या संकल्पना समजून घेऊन त्या पुस्तकाच्या आधारेच नोट्स कशा काढायच्या याविषयी चर्चा करणार आहोत.

पहिल्यांदा पुस्तक वाचून झाल्यावर सहसा लगेच नोट्स काढू नयेत. पहिल्यांदा वाचताना आपल्याला सगळंच परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं वाटत असतं, त्यामुळे अशा वेळी नोट्स काढल्यास त्या संक्षिप्त आणि अचूक होण्यापेक्षा अधिक विस्तृत आणि लांबलचक होऊ शकतात. त्यामुळे पहिल्यांदा वाचताना संकल्पना समजून घ्या. प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे वाचावे.

दुसऱ्यांदा वाचताना पेन्सिल घेऊन बसा आणि ज्या गोष्टी सहजपणे तुमच्या लक्षात राहणार नाहीत असं वाटेल अशा संकल्पना पेन्सिलनं अधोरेखित करा. तिसऱ्यांदा पुस्तक वाचताना दोनदा वाचूनही ज्या गोष्टी लक्षात राहल्या नाहीत किंवा लक्षात ठेवणं अवघड जातं आहे, अशा गोष्टी पेनानं अधोरेखित करून घ्या. चौथ्यांदा वाचताना तुम्ही त्या त्या प्रकरणातले महत्त्वाचे शब्द म्हणजेच की शब्द ठळक करा.

या प्रकारे कोणत्याही विषयाचे प्रकरण वाचताना संकल्पना, माहिती आणि आकडेवारी अधोरेखित किंवा ठळक करताना हे लक्षात ठेवा की, दुसऱ्या वाचनापासून चौथ्या वाचनापर्यंत पुस्तकातील माहिती, वाक्य, महत्त्वाचे शब्द (की-वर्ड्स) अधोरेखित किंवा ठळक करण्याचं प्रमाण कमी कमी झालं पाहिजे. ते कमी होत असेल तर त्याचा अर्थ असा की, तुमचं वाचन प्रभावी आहे आणि वाचलेला मजकूर तुमच्या लक्षात राहतो आहे.

तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा जे वाचन करणार आहात त्यात थोडा वेळ जाऊ द्या. तिसरं आणि चौथं वाचन एकदमच केलंत तर सगळं लक्षात राहिल्यासारखं वाटू लागतं आणि वेळ गेला की ते तुम्ही विसरू लागता त्यामुळे दुसऱ्यांदा वाचून झाल्यावर लगेच तिसऱ्यांदा किंवा नंतर लगेच चौथ्यांदा वाचू नका.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एक विषय किती वेळा वाचल्यावर आपल्या चांगला लक्षात राहतो हे ज्याचं त्याला माहिती असतं त्यामुळे प्रत्येक विषय तीन वेळा अथवा चारच वेळा वाचला पाहिजे असा त्याचा काही सर्वसाधारण नियम नाही. या सगळ्यामुळे उजळणी करताना अभ्यास सोपा होतो.

यातल्या पहिल्या वाचनाला सगळ्यात जास्त वेळ लागतो कारण त्यात तुम्हाला बऱ्याचशा संकल्पना आणि माहिती समजून घ्यायची असते. यात तुम्हाला अधिक वेळ लागला तरी हरकत नाही. पहिल्यांदा वाचताना तुम्ही संकल्पना

अधिक काळजीपूर्वक समजून घेतल्यास दुसऱ्यांदा किंवा गरज पडल्यास तिसऱ्यांदा तो विषय वाचायला फार वेळ लागत नाही.

परंतु आपण आधी नियोजनात म्हटलं ते लक्षात असू द्या. वेळ ठरवून त्या वेळेतच पहिलं, दुसरं किंवा तिसरं वाचन पूर्ण करावं. पुढील भागात नोटस् काढताना काय काळजी घ्यायची त्याची माहिती घेऊयात.

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी असून गीतकार, गायिका आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com