Success Story : २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त केलं टॉप!

IAS_Mukund_Kumar
IAS_Mukund_Kumar

UPSC Success story : नवी दिल्ली : यूपीएससीच्या २०१९च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मुकुंद कुमारने देशात ५४ वा क्रमांक मिळवला आणि मधुबनी जिल्ह्यातील शेतकरी मनोज ठाकूर यांच स्वप्न सत्यात उतरलं. मुकुंदने एका छोट्याशा गावात राहून, अत्यंत कमी साधनांच्या आधारे देशातील सर्वात कठीण परीक्षा पास करून दाखवली. जे उमेदवार यंदा यूपीएससीची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी मुकुंदची गोष्ट प्रेरणादायी ठरणारी आहे. मुकुंदचा छोट्या खेड्यातील शाळेपासून आयएएसपर्यंतचा प्रवास पाहूया. 

एका हिंदी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुकुंदकुमार म्हणाला, छोट्या गावातून तसेच खेड्यातून आलेले विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहू शकत नाहीत, अशी अनेकांची धारणा आहे. पण जर कठोर परिश्रम केले असेल, तर त्यांची मेहनत वाया जाणार नाही. 

मुकुंद म्हणाला, "मी माझे प्राथमिक शिक्षण मधुबनी जिल्ह्यातील राजनगर अवासिया शारदा विद्यालयातून केले. त्यानंतर २००६ मध्ये सैनिक शाळा गोलपारा आसामची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर २०१२ मध्ये दिल्ली विद्यापीठात इंग्रजी लिटरेचरला प्रवेश घेतला.

यूपीएससीच्या तयारीविषयी
पूर्व परीक्षेला बसण्यापूर्वी दोन वर्षांपासून यूपीएससीची तयारी सुरू केली होती. हा माझा पहिला प्रयत्न होता. पूर्व परीक्षेनंतर मुख्य आणि मुलाखतही चांगली झाली. यूपीएससीत यश मिळेल, याची खात्री होती. २०० ते २५० च्या दरम्यान रँक मिळेल, असे वाटत होते. पण जेव्हा यूपीएससीने निकाल जाहीर केला, तेव्हा मला धक्का बसला. कारण मला ५४ वी रँक मिळाली होती, ज्याचा विचार मी कधीच केला नव्हता, असे मुकुंद म्हणाला. 

...म्हणून यूपीएससीची निवड केली
मुकुंद यूपीएससी निवडीबद्दल म्हणाला की, 'यूपीएससी तुम्हाला एक व्यासपीठ देते, ज्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकता. मी आयएएस रँक मिळवली आहे. आणि आता मी शिक्षण, शेती, बेरोजगारी आणि गरिबी हटविण्यासाठी काम करू शकतो. आयएएस ही पोस्ट आपल्याला बरेच अधिकार देते, ज्या अंतर्गत आपण समाजात सकारात्मक बदल आणू शकतो.

मुकुंद पुढे म्हणाला, 'मला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये बदल घडवायचे आहेत. कारण माझा विश्वास आहे की, हे आपल्या समाजाचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. या दोन क्षेत्रांमुळे समाजही अधिक बळकट होईल. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा अनेक योजना आहेत. ज्याच्या अंमलबजावणीवर भर दिल्यास चांगला बदल झालेला दिसून येईल. मुकुंदने बिहार लोकसेवा आयोगाची (बीपीएससी) मुख्य परीक्षाही उत्तीर्ण केली होती.

पूर्व परीक्षा महत्त्वाची 
बाकी परीक्षार्थींप्रमाणेच मुकुंददेखील पूर्व परीक्षेला जास्त महत्त्व देतो. तो म्हणाला, पूर्व परीक्षा खूप महत्त्वाची आहे. जर आपण पूर्व पास करण्यास सक्षम नसू तर नंतरच्या तयारींना काही अर्थ नाही. पण, तिन्ही परीक्षा डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू करा. जेव्हा पूर्व परीक्षेची वेळ येईल, तेव्हा फक्त पूर्व परीक्षेकडे लक्ष द्या. त्यासाठी कमीतकमी ६ महिने समर्पित वेळ देणे फार महत्वाचे आहे. यावेळी फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करा, इतर कशावरही लक्ष देऊ नका.

या परीक्षेची योग्य तयारी करण्यास दोन वर्षे लागतात. या कालावधीत सर्व अभ्यासक्रम कव्हर करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मी स्वत: दोन वर्षे पूर्ण तयारीनंतर परीक्षा दिली. एनसीईआरटीची सर्व पुस्तके वाचणे मला आवश्यक वाटत नाही. मी फक्त एनसीईआरटी जिओग्राफीचा अभ्यास केला होता, असे मुकुंदने सांगितले. 

इतर विद्यार्थ्यांना काय सांगशील असे विचारले असता मुकुंद म्हणाला, अभ्यासक्रमानुसार सर्व विषय वाचताना जास्तीत जास्त वेळा उजळणी कशी करता येईल, याकडे लक्ष द्या. तुम्ही कोचिंग क्लासेस केले नाहीत तरी चालतील, पण मॉक टेस्ट द्या आणि उत्तर लेखनाचा सराव करा. आपल्या घरगुती पार्श्वभूमीबद्दल कधीही काळजी करू नका. कारण जर तुमची क्षमता असेल, तर यूपीएससी तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. फक्त कठोर मेहनत घ्या, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com