

सदानंद पाटील, मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 'सर्वपक्षीय घराणेशाही' अत्यंत प्रबळ असल्याचे दिसून आले आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघात तब्बल २३७ उमेदवार हे घराणेशाहीशी संबंधित होते. यातील ८१ उमेदवारांना विधानसभेत 'एन्ट्री ' मिळाली आहे. तर १५१ उमेदवारांना मतदारांनी 'घरचा रस्ता 'दाखवला असल्याचे निष्कर्ष सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आले आहेत. महत्वाचे म्हणजे एकेकाळी घराणेशाहीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजप घराणेशाहीत आता 'अव्वल ' ठरत असल्याचे दिसत आहे.