सत्ताधारी भाजपचा वारू वेगात!

विधानसभा निवडणुकीत मणिपूरमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला
Manipur Assembly elections 2022 bjp Who will Chief Minister of Manipur
Manipur Assembly elections 2022 bjp Who will Chief Minister of Manipursakal

विधानसभा निवडणुकीत मणिपूरमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. सत्तास्थापनेचे गणित जुळवून आणण्यात त्यांना काहीच अडचण नाही, अशी स्थिती आहे. सर्वसामान्य आणि वंचित घटकांतील मुलींना शिक्षणात आर्थिक पाठबळ, भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि कौशल्य विद्यापीठ सारख्या तरतुदी, शेतकरी आणि मच्छीमारांसाठीच्या भरघोस आर्थिक मदत देणाऱ्या योजना, महिलांना गॅस आणि इतर आश्वासने, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योजना आणि तरतुदींची आश्वासने देत भाजपने पुन्हा एकदा मणिपूरच्या मतदारांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले. यामुळे ईशान्य भारतात आसाम पाठोपाठ मणिपूरमध्येही सलग सत्ता मिळवत भाजपने मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत, २०१७ मध्ये २८ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसची मात्र या निवडणुकीत सपशेल पीछेहाट झाली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पक्षाला लागलेली घरघर हे त्यामागचे प्रमुख कारण.

भाजपसोबतच नॅशनल पीपल्स पार्टीच्या जागांमध्ये २०१७ च्या तुलनेत वाढ झाली. मात्र, नॅशनल पीपल्स पार्टी आणि लोक जनशक्ती पक्षासारख्या स्थानिक पक्षांचे ‘किंगमेकर’ होण्याचे स्वप्न भंगले आहे. तर, नव्यानेच स्थापन झालेल्या कुकी पीपल्स अलायन्स आणि नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाने मणिपूरमध्ये खाते उघडले आहे.

मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च अशा दोन टप्प्यात एकूण ६० जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली. यावेळी भाजपने कोणत्याही पक्षासोबत युती न करता सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेसने मात्र इतर पाच पक्षांसोबत आघाडी करत निवडणूक लढवली. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांचा समावेश होता. तरीही सत्तेचे पारडे भाजपकडे झुकलेले राहिले.

पक्षासाठी कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना भाजपकडून आखण्यात आली. इतर राज्यांप्रमाणेच येथेही पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे झाले. मोठ्या सभांऐवजी स्थानिक प्रचारावर अधिक भर राहिला. भाजपने मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्याइतकेच महत्त्व संघटन मजबूत करण्यावरही दिले. याउलट काँग्रेसला पक्षांतराचा फटका बसला. ताकदीच्या नेतृत्वाशिवाय होणाऱ्या निवडणुकीचा अपेक्षित निकाल सर्वांसमोर आहे.

मणिपूरमध्ये कौन बनेगा मुख्यमंत्री?

म णिपूरमध्ये भाजप-एनपीपी आघाडीचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे असताना मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांना पुन्हा संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. परंतु आघाडीतील अन्य घटक पक्षांनी बिरेन सिंह यांच्या नावाला विरोध केला तर त्यांची मुख्यमंत्रिपदापर्यंतची वाटचाल खडतर होऊ शकते.

एनपीपीच्या काही मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी बिरेन सिंग यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले होते. तसेच नेतृत्वबदलाची मागणी देखील केली होती. या वादात भाजपचे श्रेष्ठी हस्तक्षेप करून या अडचणींवर मार्ग काढू शकतात. सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चार जण असून त्यात बिरेन सिंग यांच्यासह कॅबिनेट मंत्री थोंगाम विश्‍वजित सिंह, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोथुजाम आणि विधानसभेचे अध्यक्ष युमनाम खेमचंद सिंह यांची नावे आघाडीवर आहेत.

माजी फुटबॉलपटू, सीमा सुरक्षा दलाचे माजी जवान आणि पत्रकार राहिलेले बिरेन सिंह यांनी पहिली निवडणूक २००२ मध्ये लढविली होती. डेमोक्रॅटिक रिल्वोशनरी पीपल्स पक्षाकडून त्यांनी मैदानात उडी घेतली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि मंत्रिपद मिळाले. बिरेन सिंह हे एकेकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचे निकटवर्तीय होते. २०१२ मध्ये काँग्रेसने निवडणूक जिंकूनही इबोबी सिंग यांच्या मंत्रिमंडळात बिरेन सिंह यांना स्थान मिळाले नाही. शेवटी मतभेदानंतर त्यांनी २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा ग्राफ वाढत गेला आणि २०१७ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. गेल्या पाच वर्षात बिरेन सिंग यांना अनेक कारणावरून टीकेचा सामना करावा लागला. विशेषत: पत्रकारांवरील देशद्रोही कलमाखाली खटले दाखल केले गेले. तसेच उपमुख्यमंत्री युमनाम जॉयकुमार सिंह यांच्याकडून खाती काढून घेतल्यानंतर त्यांचे घटक पक्षांतील नेत्यांशी मधूर संबंध राहिले नाही.

थोंगम विश्‍वजित सिंग देखील मुख्यमंत्रिदाचे दावेदार मानले जातात. त्यांनी मंत्रिपदही सांभाळले आहे. २०१५ मध्ये तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. तसेच भाजपने त्यांना राष्ट्रीय कार्यकारणीवर घेतले. प्रत्यक्षात विश्‍वजित आणि बिरेन सिंग यांच्यात वाद सुरू आहे. २०१९ च्या मंत्रिमंडळ फेरबदलात विश्‍वजित आणि जॉयकुमार सिंग यांची खाती काढून घेण्यात आली होती. काँग्रेसचे मातब्बर नेते राहिलेले गोविंददास कोथुयुजाम यांनी सहाव्यांदा बिश्‍नूपूर येथून निवडणूक जिंकली. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. परंतु २०२१ मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणावरून भाजपमध्ये प्रवेश केला. उद्योगपती युमनाम खेमचंद सिंह यांनी पहिल्यांदा २०१२ निवडणूक लढली होती. परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१७ मध्ये ते निवडून आले आणि मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com