अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

पालक पथ्यकर असला तरी तो चांगल्या पाण्यावर व सेंद्रिय पद्धतीने पोसला गेला आहे, याची खात्री करा. फार मोठी पाने असणारा पालक वापरण्यापेक्षा छोटी, कोवळी पाने असणारा पालक वापरणे योग्य असते. 
 
पालक ही भाजी जगात सगळीकडे मिळते. याची पाने भाजीसाठी वापरली जातात. फार मोठी पाने असणारा पालक वापरण्यापेक्षा छोटी, कोवळी पाने असणारा पालक वापरणे योग्य असते. पालक पथ्यकर असला तरी तो चांगल्या पाण्यावर व सेंद्रिय पद्धतीने पोसला गेला आहे, याची खात्री असणे आवश्‍यक होय. 
पालकं मधुरं पथ्यं किंचित्कटु च शीतलम्‌ । 
रूक्ष क्षारं वातलं च ग्राहि भेदकतर्पणम्‌ ।। 
......निघण्टु रत्नाकर 

पालक चवीला गोड, किंचित तिखट व क्षारयुक्‍त असतो. पथ्यकर समजला जाणारा पालक वीर्याने थंड असतो, गुणाने रूक्ष असतो म्हणूनच थोडा वातकर असतो. योग्य प्रमाणात सेवन केल्यास मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतो, अन्यथा जुलाब करवतो. एकंदर विचार करता शरीराचे पोषण करतो. 
पालक थंड व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारा असल्याने ज्यांना पित्त वाढल्यामुळे जुलाब होण्याची प्रवृत्ती असते किंवा ज्या स्त्रियांना पाळीच्या आधी द्रवमलप्रवृत्ती होते त्यांच्यासाठी पालक पथ्यकर होय. विशेषतः संध्याकाळच्या जेवणात मुगाची डाळ व पालक एकत्र शिजवून तयार केलेले सूप व तांदळाची वा ज्वारीची भाकरी घेण्याने मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत मिळते. 
मूतखडा एकदा झाला की, पुन्हा पुन्हा होण्याची प्रवृत्ती सध्या वाढताना दिसत आहे. शस्त्रकर्म झाले तरी नंतर आहारात पालकाचे सूप त्यात धन्याची पूड, जिऱ्याची पूड, सैंधव मिसळून घेण्याची सवय ठेवणे चांगले. 
गर्भवती स्त्रियांसाठी पालक पोषक असतो. हात-पाय फिकट दिसणे, अशक्‍तपणा जाणवणे असे त्रास असतील त्यांनी पालकाचे सूप रोज घेणे फायदेशीर ठरते. आधुनिक शास्त्रानुसार यातून ‘लोह’ मिळायला मदत होते. 
प्रतिकारशक्‍ती कमी असणाऱ्या बालकांसाठी पालक पथ्यकर असतो. पालकाची पातळ भाजी व पोळीचा काला करून त्यावर एक-दोन चमचे साजूक तूप घेऊन लहान मुलांनी खाणे हितकर असते. 
घरच्या बागेतील अगदी ताजा व कोवळा पालक कच्चा, कोशिंबिरीसारखी खाल्ला तरी चालतो. किडनीसंबंधातील विकार असणाऱ्यांनी मात्र, पालक तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच खाणे योग्य आहे. 

शेवग्याची पाने 
शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. उष्णतेचा त्रास असणाऱ्यांसाठी ही भाजी अनुकूल नसते. मात्र, ज्यांना वारंवार सर्दी-खोकला होतो, खोकल्यातून खूप कफ पडतो, त्यांनी आठवड्यातून एक-दोन वेळा शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाणे हितकर असते. 
कफामुळे सायनस भरल्याने जेव्हा कपाळ, डोळ्याखाली जडपणा जाणवतो, खाली वाकले की या ठिकाणी वेदना होतात अशा वेळी शेवग्याच्या पानांचा रस कपाळावर जिरवण्याने लगेच बरे वाटते. सर्दीमुळे कानात दडे बसण्याने श्रवणशक्‍ती कमी होऊ शकते किंवा खूप सर्दी झाल्यामुळे नंतर बरेच दिवस वास येणे बंद होते, त्यावर शेवग्याच्या पानांचा रस दोन चमचे, त्याच चवीनुसार अर्धा-एक चमचा मध मिसळून घेण्याने बरे वाटते. हा प्रयोग पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ न करणे चांगले. 
संधिवात, आमवात, कंबरदुखीच्या रुग्णांसाठी शेवग्याच्या पानांची भाजी आठवड्यातून एक-दोन वेळा सेवन करणे हितावह असते. 
जुनी जखम भरून येत नसेल, पू वगैरे झाला असेल त्यावर शेवग्याच्या पाने वाटून तयार केलेली चटणी बांधून ठेवण्याचा उपयोग होतो. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com