प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मला मणक्‍याचा त्रास आहे. एमआरआय काढला, त्यात मणक्‍यांत गॅप आढळून आली व त्याकरिता शस्त्रकर्माचा सल्ला दिला. माझ्या उजव्या पायाच्या शिरेवर दाब येतो, त्यामुळे थोडे चालले तरी पाय भरून येतात, मुंग्या येऊन पाय बधीर होतात. मला शस्त्रकर्म करायचे नाही. आयुर्वेदिक उपचारांनी हा विकार बरा होऊ शकतो का, याविषयी कृपया मार्गदर्शन करावे.
- जाधव

उत्तर - अशा केसेसमध्ये प्रत्येक वेळी शस्त्रकर्म करावेच लागते असे नाही. योग्य उपचार, औषधे, पथ्य, विश्रांती यांच्या योगे बरे वाटते आहे का हे पाहणे कधीही चांगले. पाठीच्या कण्याला दिवसातून दोन-तीन वेळा ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. ‘संतुलन वातबल’ गोळ्या, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचाही फायदा होईल. ज्या ठिकाणी शिरेवर दाब येतो आहे, त्या ठिकाणी निर्गुडी, शेवग्याची पाने, एरंड यापैकी मिळतील ती पाने वाफवून त्याचा लेप करण्याचा उपयोग होईल, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रकारच्या बस्ती, लेप, पोटली स्वेदन यांची योजना करणेही श्रेयस्कर. फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने काही सोपे व्यायाम करण्याचाही अशा केसेसमध्ये फायदा होताना दिसतो.

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील आपले मार्गदर्शन खूप चांगले असते. माझे वय ४४ वर्षे असून, मला तळहाताची त्वचा निघण्याचा त्रास आहे. विशेषतः पाण्याच्या संपर्कात हात राहिला की तळहाताची त्वचा निघते, कधी कधी चिराही पडतात. आजपर्यंत अनेक मलमे, अनेक साबण वापरून पाहिले, पण पाण्याचा संपर्क आला की हमखास त्रास होतो. कृपया उपाय सुचवावा.
- खटावकर 
उत्तर -
हा एक प्रकारचा रक्‍तदोष असून, यावर वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे घेणे सर्वांत चांगले. बरोबरीने ‘अनंतसॅन गोळ्या’, ‘संतुलन यू.सी. चूर्ण’ घेण्यास सुरुवात करता येईल. पादाभ्यंग हा सहसा तळपायांवर केला जातो, मात्र आपणास हातांवर करण्याचाही अधिक चांगला उपयोग होईल. पंचतिक्‍त घृत घेण्याचा, तसेच आहारात किमान चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करण्याचाही उपयोग होईल. पाण्याचा फार वेळ संपर्क येणार असेल तर हातात मोजे घालणे आवश्‍यक. टोमॅटो, दही, विरुद्ध आहार, सिमला मिरची, वांगे, गवार, मोहरी वगैरे तसेच अतिप्रमाणात टोमॅटो, चिंच वगैरे पदार्थ आहारातून टाळणे श्रेयस्कर.

मी ४३ वर्षांची असून, गेल्या दोन-चार महिन्यांपासून माझ्या हनुवटीवर वारंवार फोड येत आहेत. माझा चेहराही काळवंडलेला आहे व गालांवर वांगसुद्धा आहेत. कृपया उपाय सुचवावेत. माझे गर्भाशयाचे शस्त्रकर्म झाले आहे.
- गायकवाड

उत्तर - या सर्व तक्रारींचे मूळ स्त्री-असंतुलनात असू शकते. गर्भाशय काढलेले असणे हे यामागे मुख्य कारण असू शकते. गमावलेले गर्भाशय परत आणता येत नसले तरी त्यामुळे शरीरावर झालेला दुष्परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न नक्की करता येतात. यादृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू नियमित वापरणे सर्वोत्तम. बरोबरीने ‘स्त्री संतुलन कल्प’ घालून दूध घेणे, ‘अनंतसॅन’, महामंजिष्ठादि काढा घेणे, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर रोज ‘संतुलनचे क्रेम रोझ’ लावणे, साबणाऐवजी मसुराचे पीठ उटण्याप्रमाणे वापरणे चांगले, नियमित गंडुष करण्यानेही चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत मिळते. यासाठी इरिमेदादि तेल किंवा ‘संतुलन सुमुख तेल’ वापरणे चांगले.
 

माझे वय ४६ वर्षे आहे. मला बऱ्याच वर्षांपासून पित्ताचा त्रास आहे. सध्या अंगावर रोज पित्त उठते. संपूर्ण शरीरावर खाज येते. छाती-पोटात व हातापायांची जळजळ होते. ॲलर्जीची गोळी घेतली तर शौचाला खडा होते. ॲलर्जीची तपासणी केली तर त्यात दुधाच्या सर्व पदार्थांची व ॲलोपॅथीच्या गोळ्यांची ॲलर्जी असल्याचे समजले. कृपया मार्गदर्शन करावे.
- अरुणा
उत्तर -
काही दिवस काटेकोर पथ्य पाळले व औषधे घेतली तर हा त्रास पूर्ण बरा होऊ शकतो. जेवणानंतर कामदुधा, प्रवाळपंचामृत, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेणे, रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल’ किंवा अविपत्तिकर चूर्ण घेणे, आठवड्यातून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ होऊ देणे हे उपाय लगेच सुरू करता येतील. सकाळ-संध्याकाळ साळीच्या लाह्यांचे पाणी पिण्याचा उपयोग होईल. आहारात तेलाऐवजी साजूक तूप व गव्हाऐवजी तांदूळ, ज्वारी, नाचणी, भगर ही धान्ये वापरणे श्रेयस्कर. भाज्यांमध्ये तोंडली, भेंडी, दुधी, भोपळा वगैरे वेलीवर येणाऱ्या भाज्या, कडधान्यांमध्ये मुगाचा आहारात समावेश करता येईल. खाज असेपर्यंत साबणाऐवजी मसुराचे पीठ किंवा ‘सॅन मसाज पावडर’ हे उटण्याप्रमाणे वापरणे हेसुद्धा चांगले.

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. संतुलनच्या श्रुती तेल, निद्रासॅन गोळ्या यांचा मला आजवर चांगला उपयोग झालेला आहे. मला महिन्यातून एक-दोन वेळा उलटी होते. उलटी झाली की पोटात फार बरे वाटते. उलटी व्हावी असे कधी कधी वाटते. यासाठी काही औषध आहे का?
- सुरेखा
उत्तर -
 वारंवार उलटी होणे तितकेसे चांगले नाही. घरच्या घरी उलटीची औषध घेणे तर मुळीच चांगले नाही. उलटी होण्याइतपत पोटात दोष साठून राहू नये यासाठी उपचार करणे आवश्‍यक होय. यासाठी जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेण्याचा, दिवसभर उकळलेले गरम पाणी पिण्याचा उपयोग होईल. उलटी होण्याची वाट न पाहता, पोटातून दोष शौचावाटे निघून जावेत यासाठी दर आठ दिवसांनी दीड-दोन चमचे गंधर्वहरीतकी घेण्याचा उपयोग होईल. रात्री  झोपण्यापूर्वी चमचाभर अविपत्तिकर चूर्ण घेण्याचाही फायदा होईल. संध्याकाळचे जेवण दुपारच्या जेवणाच्या निम्मे आणि पचण्यास हलके असणे हेसुद्धा चांगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com