आले गणराय ! समाजमनावर आघात करणाऱ्या घटनांवर बनवल्या कवी सोमेश यांनी काव्यमय प्रतिकृती (Video) 

Mumbai Lifeline
Mumbai Lifeline

सोलापूर : तुळजापूर वेस भागातील तरुण कलावंत तथा कवी सोमेश हिरेमठ यांनी महापुराने मोडलेले संसार, कोरोनाचे संकट, बंद मंदिरे, निर्भया आरोपींची फाशी, रिकामे रंगमंच असे अनेक देखावे समाजमनावर उमटलेल्या घटना काव्य व प्रतिकृतींच्या माध्यमातून आकर्षक मांडणीद्वारे सादर केले आहेत. अनेक घटनांमुळे समाजाचे भळभळणारे दुःखच त्यातून त्यांनी मांडले आहे. 

सोमेश हिरेमठ हे सोलापूर शहरातील तुळजापूर वेस भागात राहतात. मुंबईला आयटी कंपनीमध्ये काम करणारे सोमेश हे उत्तम कवीदेखील आहेत. घरात गणपती स्थापन करताना त्यांनी या वर्षी झालेल्या घटनांमधून समाजाला योग्य संदेश देणाऱ्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. मुंबई लाईफटाइम प्रतिकृतीमध्ये त्यांनी एक वर्षभरापूर्वी लोकल स्थानकावरील गर्दी व कोरोनामुळे रिकाम्या स्थानकांच्या माध्यमातून झालेला बदल दाखवला आहे. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर मंदिर कोरोनामुळे बंद असल्याने गतवर्षी श्रावण महिन्यातील गर्दी व आता बंद दरवाजे कोरोनाचे परिणाम दाखवतात. सिद्धेश्‍वर मंदिरांची प्रतिकृती भव्य स्वरूपात साकारली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची आषाढी वारी व यावर्षी संतांच्या पादुका घेऊन जाणारी बस पाहावयास मिळते. कोरोनामुळे तुळजापूरच्या मंदिराचे बंद झालेले दरवाजे प्रतिकृतीच्या माध्यमातून मांडले आहे. 

या वर्षी अनेक बॉलिवूड कलाकारांचे निधन झाले. नृत्य दिग्दर्शिका सरोज खान, इरफान खान, सुशांत सिंह, ऋषी कपूर, निशिकांत कामत यांच्या मृत्यूबद्दलच्या माहितीने या घटनांचे प्रभावी चित्रण केले आहे. काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये एका गर्भार हत्तिणीने पाण्यात उभे राहून स्वतःचे प्राण सोडले. या घटनेने समाजमन हळहळले. त्यावर सोमेश यांनी "माय तळमळली ती जाता जाता, गर्भार राहूनही कूस तिची वांझोटीच राहिली आजन्म' अशा शब्दांत त्यांनी काव्य व प्रतिकृतीची मांडणी केली आहे. 

कोल्हापूर व इतर भागात झालेल्या पुरांच्या घटनांवर त्यांनी पाण्यात बुडालेल्या शहराचे चित्रण प्रतिकृतीमध्ये साकारले आहे. नाट्य चळवळीचा बंद पडदा कोरोनामुळे अजूनही उघडलेला नाही. रिकाम्या खुर्च्या, रंगमंचावर कलावंत नाहीत ही वेदना मांडताना त्यांनी "रिकाम्या खिशास कोण घाबरतो येथे, हा रिकामा रंगमंच छळतो सांजवेळी' या शब्दांची जोड प्रतिकृतीला देत नाट्यप्रेमींच्या वेदना मांडल्या आहेत. 

"निर्भया'च्या घटनेला काव्याची धार 
निर्भयाच्या आरोपींना फाशीची घटना घडली. "निर्भयाची हाक, गुदमरला श्‍वास, इथेच जगणे मज अवघड जाई, मी अंश तुझ्या देहाचा, गर्भात पुन्हा घे आई' हे शब्द ते मांडतात. निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया" न्याय माझ्या बाहुलीच्या पावित्र्यतेवर झाला, पुन्हा एकदा आईपणाचा ओटीभरण झाल्याचा भास मला झाला' या कवितेत मांडली आहे. त्यासोबतच त्यांनी या आरोपींच्या पत्नींच्या वाट्याला आलेले वैध्यवाचे दुःख "शापित असावे कुंकू किंवा तुझा हात, जो अवघा जन्म तू वैध्यवाचे दान दिलेस' या शब्दांसह बाहुल्यांच्या माध्यमातून ताकदीने मांडले. कोणत्याही घटनेत एक स्त्री पीडित होते अन्‌ त्या घटनेचा परिणाम म्हणून वैध्यवातून पुन्हा स्त्रिया पीडित होतात, हा संदेश त्यांनी दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com