जीनिव्हामध्ये ‘गंगावतरण’

जगातील अनेक नद्यांच्या पाण्याची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेवून त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. त्याच अनुषंगाने गोमुख गंगाजलासाठी भारतातर्फे प्रयत्न करण्यात आले. शास्त्रीय पुरावे सादर केले गेले आणि त्याला जीआय मानांकन मिळाले, त्याविषयी.
Considering water characteristics of rivers world they got GI rating
Considering water characteristics of rivers world they got GI ratingsakal

यंदाची जागतिक व्यापार संघटनेची (डब्ल्यूटीओ) जीनिव्हा मंत्रिपरिषद मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली. शेती, मत्स्य व्यवसाय, कोविड लससंदर्भातील पेटंट इत्यादी महत्त्वाच्या विषयांमुळे परिषदेला वेगळे महत्त्व होते. परिषद चालू असतानाही काही अशा घडामोडी झाल्या ज्याला प्रसिद्धी मिळाली, परंतु वाच्यताच झाली नाही. त्यातली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे भारताच्या गोमुख गंगाजलचे जीआय नोंदणी करण्यासंदर्भातले जाहिरीकरण. परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी पुण्याच्या जीएमजीसी संस्थेतर्फे गोमुख गंगाजल ‘जीआय’बद्दल सादरीकरण करण्यात आले. तिथे भारतीय माध्यमांनी याची दखल घेतली व त्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ती भारताचे अस्तित्व दाखवण्यास कारणीभूत ठरली नव्हे; तर हिमालयातील गंगेने जीनिव्हात भारताच्या बाजूने अवतरण केले अशी अनुभूति आली.

डब्ल्यूटीओच्या मंत्री परिषदेला विशेष महत्त्व असते. या परिषदेचा जगभरातील मंडळी किंवा सभासद राष्ट्र संधी आणि आव्हाने यादृष्टीने विचार करतात. त्यानुसार व्यूहरचना केली जाते. यानिमित्ताने दिडशेपेक्षा अधिक राष्ट्रांचे प्रतिनिधी एकाच मंचावर येवून व्यापार धोरणावर विचारविनिमय करतात. काही राष्ट्रांनी अशा मंत्री परिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा अतिशय उत्कृष्ट उपयोग आपल्या देशातील प्रमुख आणि वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांसाठी करून घेतला आहे. उदाहरणार्थ, २००३मध्ये मेक्सिकोमध्ये झालेल्या कानकून परिषदेमध्ये मेक्सिकोच्या प्रतिनिधींनी त्यांचे प्रसिद्ध पेय टकीला जगासमोर प्रदर्शित केले. त्या टकीलाला जीआय म्हणजे भौगोलिक उपदर्शन मिळाले म्हणून जगात नेण्यास सज्ज असलेला आमचा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ, असा संदेश मेक्सिकोच्या प्रतिनिधींनी जगाला दिला. त्यामुळे टकीला जगभरात सहजरीत्या पोहोचली, ती भारतातही आली. कारण भारत डब्ल्यूटीओचा सभासद असल्याने त्यालाही इतर सभासद राष्ट्रांमधून आलेले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आपल्या देशात स्वीकारणे भाग होते. थोडक्यात मेक्सिकोने डब्ल्यूटीओच्या मंत्री परिषदेचा संधीत रूपांतर करीत जगभरात टकीला पोहोचवला. त्याच धर्तीवर भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ जगभरात पोहोचविण्याचे उद्दिष्ट ‘जीएमजीसी’ने ठरवले आणि त्या अनुषंगाने गोमुख गंगाजल जीनिव्हामध्ये प्रसारित केला.

विकसित देशांची खेळी

भारत जगासाठी नेहमीच दाता राहिला आहे. भारताचा जगभरातील व्यापाराला इतिहासात वेगळे स्थान आहे. आता भारत जगाच्या व्यापारासाठी अडथळा ठरत आहे, असे वातावरण जीनिव्हा परिषदेमध्ये निर्माण झाले होते. ती विकसित राष्ट्रांची खेळी होती. अशा वेळेला त्यांना झटका देणे गरजेचे होते आणि त्यासाठी गंगाजल जीआय माध्यम सापडले. परिषदेच्या मसुद्याला अनुसरून भारताने सादर केलेले प्रस्ताव चर्चेला होतेच; परंतु जीआय वरील कुठलाही प्रस्ताव भारताने दाखल केला नव्हता. याचा अभ्यास जीएमजीसीने केला असल्याकारणाने ऐनवेळी अशा प्रकारचा महत्त्वाचा विषय पुढे आणणे आणि भारत जागतिक स्तरावर योग्य पद्धतीने कार्य करतो, हे दाखविणे गरजेचे होते. हे वेगळेपण सुदैवाने यशस्वी झाले, डब्ल्यूटीओनी भारताला दिलेल्या कायद्यातून गंगाजलाच्या जीआयबद्दलची माहिती सर्वत्र देण्यात आम्हाला यश आले. खऱ्या अर्थाने जीनिव्हामध्ये ‘गंगावतरण’ झाले.

असे केले प्रयत्न

इतर राष्ट्रांमधील नद्यांच्या पाण्याला त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे जीआय मिळाले आहे. मग गंगाजल जीआय का असू नये? असा प्रश्न आला. मग गोमुख गंगाजलचा जीआय अभ्यास सुरू झाला. जीआय म्हणजे एका विशिष्ट भागातून येणारा विशेष पदार्थ त्याला ‘भौगोलिक उपदर्शन’ म्हणजेच जीआय म्हणतात. त्या भागातील माती, पाणी, वातावरण आणि मानवी कौशल्ये याला अनुसरून तो वैशिष्टपूर्ण पदार्थ बनवला जातो. उदा. दार्जिलिंगचा चहा अथवा महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. मानवनिर्मित स्थाननिहाय विशेष वस्तूंनाही जीआय मिळतो जसे की, पैठणी साडी, पुणेरी पगडी इ. भारतात अजून एक प्रकारचा जीआय नोंद होऊ शकते तो म्हणजे नैसर्गिकरित्या निर्माण होणारे स्थाननिहाय वैशिष्ट्यपूर्ण वस्तू. उदा. मकराणा मार्बल. राजस्थानातील या मार्बलला जीआय मिळाला आहे. त्यातूनच ताजमहाल साकारला. या पार्श्वभूमीवर गोमुख गंगाजल वैशिष्ट्यपूर्ण आहे मग त्याची नोंद का नाही करायची, या विचारांनी जोर धरला. आश्चर्य म्हणजे अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील शास्त्रीय पुरावे मिळाले. तेसुद्धा परकी शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगातून. त्यांच्या पुराव्यानुसार गोमुख गंगाजलात नैसर्गिकरित्या ऑक्सिजनचे प्रमाण इतर नद्यांपेक्षा पंचवीसपट अधिक आहे. अशी सगळी वैशिष्ट्ये मांडत शास्त्रीय पुराव्यानिशी जीआयसाठी अर्ज दाखल केला तोही २६ एप्रिल रोजी, तो दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा होतो. गोमुख गंगाजलाच्या जीआयची माहिती आणि सादरीकरण जीनिव्हात करण्याचे ठरविले. अखेरीस अनेक साधू महंतांनी पुरस्कृत केलेल्या गंगाजलाचे महत्त्व औपचारिकरित्या कायदेशीरपणे जगासमोर आले.

नद्यांच्या पाण्यासाठीही जीआय

  • जर्मनीतील ऱ्हाईन नदीच्या पाण्याला कलोन वॉटर म्हणून जीआय. नंतर कलोन वॉटर आफ्टर शेव, तसेच सुगंधी साबणासाठी विशेष प्रसिद्ध.

  • ऑस्ट्रेलियातील मार्गारेट आणि हयशट्याग नद्यांच्या पाण्यांनाही जीआय. या नद्यांच्या पाण्यावरील द्राक्षाला विशेष चव असते. त्यापासून बनवलेली वाईनही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

गोमुख गंगाजलाची वैशिष्ट्ये

  • गोमुख गंगाजलात ऑक्सिजनचे प्रमाण पंचवीसपट अधिक

  • या पाण्यात जिवाणूविरोधी नैसर्गिक घटक

  • या पाण्यात स्वतःच स्वतःला स्वच्छ करण्याची वेगळी क्षमता आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com