World Telecommunication Day 2022: मोबाईल ही आता काळाची गरज बनली आहे. आता लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण मोबाईल वापरतात. मोबाईल प्रत्येकाची मुलभूत गरज झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कपडे, शूज, दागिने, फर्निचर एवढंच काय जेवण आणि औषधंसुद्धा आपण मोबाईलच्या माध्यमातून घरपोच मागवू शकतो. थोडक्यात मोबाईलमुळे एकंदरीतच लोकांचं जगणं सुसह्य झालंय. संपूर्ण जगातील दूरसंचार क्षेत्रांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी चीन आहे. भारतातील फोन ग्राहकांच्या संख्येने फेब्रुवारीत १.१८ अब्जचा आकडा पार केला. पण जगात पहिला टेलिफोन आणि मोबाईल कधी आला माहिती आहे का? चला तर मग आज जागतिक दूरसंचार दिनानिमित्तानं जाणून घेऊयात आपल्या देशातील दूरसंचार क्षेत्राबद्दल.
भारतात पहिला टेलिफोन कधी आला?
१८८१ मध्ये भारत सरकारने इंग्लंडच्या ओरिएंटल टेलिफोन कंपनीला कोलकाता, मुंबई आणि मद्रास इथे टेलिफोन सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानुसार २८ जानेवारी १८८२ पासून भारतात मुंबईसह तीन ठिकाणी टेलिफोन एक्सेंज सुरू झाले. जागतिक दूरसंचार क्षेत्राने दिलेली ही सर्वात महत्त्वाची देण होती. मोबाईलच्या आधी सर्वत्र टेलिफोन अर्थात लँडलाइन फोन होते.
जगात पहिला मोबाईल फोन कधी आला?
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर जॉन एफ मिशेल आणि मार्टिन कूपर यांनी मोटोरोलाचा पहिला मोबाईल फोन १९७३ साली बनवला. त्यानंतर 1983 साली मोटोरोलाचा द डायनाटॅक 8000X हा पहिला मोबाईल फोन बाजारात आला. हाच मोबाईल जगातील पहिला मोबाईल मानला जातो.
भारतात अनेक कंपन्या विकतात स्मार्टफोनः
१९८३ नंतर मोबाईल जगतात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल घडून आले. पूर्वी श्रीमंतांकडे आढळणारे मोबाईल फोन आता गावाखेड्यातील गरीबातल्या गरीब लोकांच्या हाती पोहोचलेत. सध्या अॅपल वनप्लस, सोनी, सॅमसंग, मायक्रोमॅक्स, रिअलमी, विवो, ओप्पो, नोकियासारख्या अनेक कंपन्या आता मोबाईल निर्मितीच्या व्यवसायात उतरल्या आहेत.
भारतात एक अब्ज मोबाईल ग्राहक-
पण एके काळी लोकप्रिय असलेल्या लँडलाइन फोनची मागणी मात्र प्रचंड प्रमाणात घटली आहे. भारतातील फोन ग्राहकांच्या संख्येने फेब्रुवारीत १.१८ अब्जचा आकडा पार केला. स्वस्त दरात उपलब्ध होणारे हँडसेट, कंपन्यांमधील वाढती स्पर्धा आणि दूरसंचार सेवेचा स्वस्त दर या तीन प्रमुख कारणांमुळे लँडलाइनला फटका बसला आहे. जगभरात एका तासात दोन कोटींहून अधिक स्मार्ट फोन्सची विक्री होते, भारतात २०१३ मध्ये २० कोटी इंटरनेट ग्राहक होते, तर आज तीच संख्या ५० कोटींहून अधिक झाली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.