संयुक्त राष्ट्रे : भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला 2027 पर्यंत मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येत 27.3 कोटींची भर पडेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. याचबरोबर या शतकाच्या अखेरपर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांक कायम ठेवेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक लोकसंख्येचा अंदाज अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक व सामाजिक विभागाच्या लोकसंख्या शाखेने जाहीर केला आहे. या अहवालात म्हटले आहे, की पुढील तीस वर्षांत जगाची लोकसंख्या दोन अब्जाने वाढेल. सध्या जगाची लोकसंख्या 7.7 अब्ज असून, ती 2050 पर्यंत 9.7 अब्जावर जाईल. या शतकाच्या अखेरीस जगाची लोकसंख्या 11 अब्जापर्यंत जाईल.
जगाची 2050 पर्यंत वाढणारी निम्म्याहून अधिक लोकसंख्या नऊ देशांमध्ये केंद्रित झालेली असेल. या देशांमध्ये भारत आघाडीवर असेल आणि त्याखालोखाल नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका यांचा समावेश असेल.
लोकसंख्येच्या बाबतीत 2027 मध्ये भारत चीनला मागे टाकेल. भारताची लोकसंख्या 2019 ते 2050 या काळात 27.3 कोटीने वाढेल. याच काळात नायजेरीयाची लोकसंख्या 20 कोटीने वाढेल. 2050 पर्यंत जगातील वाढणाऱ्या एकूण लोकसंख्येमध्ये 23 टक्के वाटा भारत आणि नायजेरिया यांचा असेल.
भारत चीनला मागे टाकण्याचे अंदाज
वर्ष - अंदाज
2015 - 2022
2017 - 2024
2019 - 2027
सर्वाधिक लोकसंख्या (2019)
चीन- 1.43 अब्ज
भारत- 1.37 अब्ज
अमेरिका - 32.9 कोटी
इंडोनेशिया - 27.1 कोटी
सर्वाधिक लोकसंख्या (शतकाअखेरीस)
भारत - 1.5 अब्ज
चीन - 1.1 अब्ज
नायजेरिया - 73.3 कोटी
अमेरिका - 43.3 कोटी
पाकिस्तान - 40.3 कोटी
जागतिक लोकसंख्या
वर्ष - लोकसंख्या
2019 - 7.7 अब्ज
2050- 9.7 अब्ज
2099 - 11 अब्ज
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.