धष्टपुष्ट की सुदृढ?

आरोग्य व सौंदर्य, आरोग्य व आकर्षक शरीरयष्टी या दोन्ही गोष्टींचा मिलाप म्हणजे सुदृढता
health and attractive physique
health and attractive physiquesakal
Summary

सुदृढतेसाठी महत्त्वाचा असतो व्यायाम. कितीही पोषक अन्न खाल्ले तरी त्याचे पचन झाल्याशिवाय शक्तीत रूपांतर होऊ शकत नाही. दोन घास कमी मिळाले तरी हरकत नसते, पण जर योग, प्राणायाम, व्यायाम वगैरेंची योजना केली तर सुदृढता मिळू शकते.

सुदृढतेसाठी महत्त्वाचा असतो व्यायाम. कितीही पोषक अन्न खाल्ले तरी त्याचे पचन झाल्याशिवाय शक्तीत रूपांतर होऊ शकत नाही. दोन घास कमी मिळाले तरी हरकत नसते, पण जर योग, प्राणायाम, व्यायाम वगैरेंची योजना केली तर सुदृढता मिळू शकते.

आरोग्य व सौंदर्य, आरोग्य व आकर्षक शरीरयष्टी या दोन्ही गोष्टींचा मिलाप म्हणजे सुदृढता. मात्र गुबगुबित व स्थूल शरीरयष्टी म्हणजे धष्टपुष्टता. मांसाहारासाठी पोसलेला प्राणी धष्टपुष्ट असण्याकडे खूप लक्ष दिले जाते, सध्या तर त्यासाठी भलभलत्या प्रक्रियासुद्धा केल्या जातात, पण यामध्ये सुदृढतेकडे, आरोग्याकडे दुर्लक्षच होते. व्यवहारातही सांपत्तिक परिस्थिती थोडीशी चांगली असली पण आयुर्वेदातील अन्नयोगाच्या संकल्पना माहीत नसल्या तरी चांगले व पौष्टिक जेवायचे या नावाखाली माणसे जे काही खातात त्यामुळे ती धष्टपुष्ट होतात.दिसायला गुबगुबित, स्थूल मनुष्य वेळप्रसंगी कष्टाची कामे करू शकेलच असे नाही.

व्यवहारातील कामे न थकता नीट होण्यासाठी, प्रसंगी अविरत काम करण्यासाठी जी शरीरशक्ती लागते तेव्हा आवश्यक असतो सुदृढपणा. सुदृढ म्हणजे घट्ट, कणखर, सुबद्ध. ज्याप्रमाणे एखाद्या यंत्रातील अनेक भाग जोपर्यंत एकमेकांशी नीट बद्ध असतात, त्यांच्यात सुसूत्रता असते तोपर्यंत त्याचे कार्य व्यवस्थित चालू राहते. मात्र एखादाही भाग निखळला किंवा त्यांच्यातला बंध सैल होऊ लागला तर अपेक्षित कार्य होऊ शकत नाही. शरीराचेही असेच आहे. सुदृढतेसाठी महत्त्वाचा असतो व्यायाम. कितीही पोषक अन्न खाल्ले तरी त्याचे पचन झाल्याशिवाय शक्तीत रूपांतर होऊ शकत नाही. दोन घास कमी मिळाले तरी हरकत नसते, पण जर योग, प्राणायाम, व्यायाम वगैरेंची योजना केली तर सुदृढता मिळू शकते.

एका विशिष्ट वयापर्यंत, विशेषतः बालवयात गोल गोंडस शरीरामुळे आरोग्य चांगले आहे अशी गैरसमजूत होण्याचा संभव असतो, परंतु वाढत्या वयाबरोबर हा गोंडसपणा, धष्टपुष्टपणा आटोक्यात आणता आला नाही तर पुढे सुदृढतेचा, शरीरशक्तीचा अभाव पदोपदी जाणवू लागतो. अन्न-वस्त्र-निवारा या मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा. यातील निवारा या शब्दात शरीराचे ऊन, वारा, पाऊस वगैरेंपासून संरक्षण करण्याची व्यवस्था म्हणजे घर असा अर्थ अपेक्षित असतो. व्यक्तीचा निवारा म्हणजे त्याचे घर तसेच शरीरस्थ अग्नीचा निवारा म्हणजे शरीरअसे जर लक्षात घेतले तर या जाठराग्नीला प्रदीप्त करण्यासाठी योग-प्राणायामाला पर्याय नाही.

योग-प्राणायामाशिवाय शरीर-मन सुदृढ राहू शकत नाही, अग्नी पर्यायाने हॉर्मोन्सचे संतुलन टिकू शकत नाही. शरीराने व मनाने सुदृढ असलेल्या मंडळींची राहणीमानाची पद्धत पाहिली तर असे लक्षात येते की त्यांच्या इतर सर्व गोष्टी इतरांप्रमाणेच असू शकतात परंतु सकाळी लवकर उठणे, वेळेवर व मिताहार घेणे व लवकर झोपणे या सवयी मात्र त्यांनी नक्कीच आचरलेल्या असतात. तसेच त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात सकाळी अर्धा तास फिरायला जाणे, घरातील झाडलोट करणे, सामान काढणे-ठेवणे वगैरे काही अंगमेहनतीची कामे करणे, दंड बैठका घालणे, पोहणे वगैरे व्यायामांचा समावेश केलेला दिसतो; याच्या जोडीला प्राणायाम व प्रार्थना यांचाही समावेश नियमाने केलेला दिसतो. सुदृढ होऊन दीर्घायुषी होण्यात या गोष्टींचे महत्त्वाचे योगदान असलेले दिसते. सुदृढ शब्दात दृढ शब्द आहे.

‘उपासनेला दृढ चालवावे’ असे समर्थ श्री रामदास स्वामींनी सांगून ठेवलेले आहे, उपासना तर आपण सर्वच करतो पण तिला दृढ चालवत नाही. मध्येच पुराण-प्रवचनांची लाट येते, ध्यान-धारणेची लाट येते, योग-आसनांची लाट येते व काही दिवस सर्व मंडळी या लाटांच्या मागे लागलेली दिसतात. नंतर मात्र हलके हलके सबबी मोठ्या होतात व दिनक्रमात तडजोड करणे सुरू होते. मनाचे, शरीराचे आरोग्य दृढ राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याने शरीरात कार्यान्वित होणाऱ्या शक्तीमुळे शरीर सुदृढ होते. व्यायाम करायचा तर जिममध्येच जायला पाहिजे वा अमुक मैदानी खेळच खेळायला पाहिजेत असे नाही, उलट सध्याच्या पॅन्डेमिकमध्ये घराबाहेर जाणे दुष्कर झाले तेव्हा बाह्यसाधनांवर अवलंबून असणाऱ्यांच्या आरोग्याचे गणित साफ कोलमडले. योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम करण्यासाठी ना कोणती साधने लागतात, ना घराबाहेर पडावे लागते, ना भलतीच फी भरायची आवश्यकता असते. एकदा मनाचा निश्र्चय दृढ असला तर योग-प्राणायामात कोणताही व्यत्यय येऊ शकत नाही. प्राणायाम, योग, आसन यांच्यामुळे शरीरातील जाठराग्नी व हॉर्मोन्सला चालना मिळते व मग शरीर सुदृढ व्हायला मदत मिळते. इतरांच्या सुख-दुःखात मदत करून सामाजिक जीवन समृद्ध करण्याने मानसिक शरीर सुदृढ होते. प्रार्थना करण्याने म्हणजेच देवासमोर नतमस्तक होण्याने (मग देव कुठलाही का असेना) आत्म्याची सुदृढता अनुभवता येते.

बऱ्याचदा मंडळी शरीराने धष्टपुष्ट असतात, सुदृढही असू शकतात पण मनाने एकदम कमकुवत असतात. जसे अन्नापेक्षा व्यायाम श्रेष्ठ तसे शरीरापेक्षा मन श्रेष्ठ. मनाची सुदृढता खूप आवश्‍यक असते. मी म्हणेन तसेच व्हायला हवे, मला हवे ते सर्व मला मिळालेच पाहिजे, मी म्हणजे सर्वस्व, माझा फायदा तोच खरा व्यवहार, माझ्यासाठीच सर्व जग चालते आहे अशा तऱ्हेचे विचार मनात असणे हे मनाच्या सुदृढतेचा घात करतात. एखादा मजबूत खांब आतून वाळवीने पोखरला जावा त्याप्रमाणे असे कमकुवत मन शरीराला पोखरून टाकते. व्यावहारिक दैनंदिन जीवनात उपयोगी पडली नाही तर त्या शारीरिक सुदृढतेचा काय उपयोग? म्हणून शरीराच्या सुदृढतेचा उपयोग व्हायचा असेल तर आतले मनही सुदृढ असणे आवश्‍यक असते. जोपर्यंत सामाजिक जीवन समृद्ध नसेल तोपर्यंत मन सुदृढ होत नाही. चारचौघात मिसळणे, मैत्रीचा अनुभव करणे-करवणे, उत्सवादी प्रसंगांतून आनंद घेणे या सर्व गोष्टी मनाला अधिकाधिक सुदृढ करतात. संगीत, नृत्य, खेळ या गोष्टी पण मनाला सुदृढ करतात. जोपर्यंत मनाच्या सुदृढतेसाठी खास प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत नुसत्या सुदृढ शरीराचा वा व्यायामाचाही उपयोग होत नाही. शारीरिक सुदृढतेसाठी व्यायाम व प्राणायाम, मानसिक सुदृढतेसाठी मैत्रीभाव व समाजकार्य तसेच ‘स्व’च्या म्हणजे अध्यात्मिक सुदृढतेसाठी ध्यान, चिंतन व आत्मनिरीक्षण आवश्‍यक असते. अशा प्रकारे सर्वांगाने सुदृढ व्यक्ती हीच खरी यशस्वी होऊनही शांत राहू शकते, आनंद घेऊ शकते. आज अशा व्यक्ती असलेल्या सुदृढ समाजाची खूप आवश्‍यकता आहे. अशा सुदृढ समाजातच सुदृढ नागरिकत्व व सुदृढ राष्ट्रीयत्व जोपासले जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com