पावसाळ्यातच येणाऱ्या 'या' फळाला अमृताचा दर्जा, जाणून घ्या गुणधर्म

java plum
java plume sakal

नागपूर : पावसाळा येताच धरणी चिंब झाली की, निसर्गाला जणू उधाणच येते. याच मोसमात विविध फळपिकांनाही बहर येतो. जांभूळ हा त्यातीलच प्रकार. पावसाळ्याच्या सुरुवातीला फक्त १५ ते २० दिवस दिसणारी जांभळं आरोग्यवर्धक आहेत. पावसाळा सुरू होताच प्रत्येकाने एकदा तरी जांभूळ (java plum) खावेच, असे डॉक्टर आवर्जून सांगतात. आयुर्वेदात जांभळाला संपूर्ण फळ संबोधले जाते. काही ठिकाणी तर याला अमृताची उपमा दिली आहे. सध्या जांभळाचा सिझन सुरू आहे. मग चला तर जाणून घेऊया आरोग्यवर्धक (health benefits of java plum) या फळाबद्दल. (know about health benefits of java plum)

java plum
'नर्मदा आरती'वर ७७ लाखांची उधळपट्टी, माहितीच्या अधिकारात बाब उघड

आयुर्वेदात जांभळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये हमखास त्याचा उपयोग केला जातो. मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, यकृत रोगांवर जांभळ रामबाण उपाय आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. ग्रीष्म ऋतूत आंबा अमृतफळ तर वर्षांऋतूत जांभळाला अमृतफळ म्हणतात.

जांभूळ पाचक, यकृत उत्तेजक असते. पांडुरोग (अ‍ॅनिमिया), कावीळ, रक्तदोषाविकार या आजारांवर जांभळात असलेल्या नैसर्गिक लोह तत्त्वामुळे लवकर गुण येतो. जांभळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यात प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व थोड्या प्रमाणात मेद असतो. जांभळाचे फळच नव्हे तर त्याची पानेही गुणकारी आहेत. जांभळाच्या पानात ई जीवनसत्त्व असते. तर बियांमध्ये ‘ग्लुकोसाईड जांबोलिन’ हा ग्लुकोजचा प्रकार असतो. ज्यामुळे शरीरातील साखर नियंत्रित राहते.

यकृताची कार्यक्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ७-८ जांभळे चारपट पाण्यात भिजवून १५ मिनिटे उकळवावी. त्यानंतर जांभळातील बियांसह जांभळाचा पाण्यामध्ये लगदा करून हे द्रावण दिवसात ३-४ वेळा प्यावे. यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते. तसेच यकृत कार्यक्षम होतात.

मधुमेही रुग्णांसाठी संजीवनी -

जांभळाचे बी व साल मधुमेह आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. जांभूळ बी १५० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, आवळा ५० ग्रॅम, ५० ग्रॅम मिरे, ५० ग्रॅम कडुनिंबाची पाने व ५० ग्रॅम कारल्याच्या बिया यांचे चूर्ण एकत्र करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर दोन चमचे घेतल्यास मधुमेह आजार आटोक्यात राहतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण मधुमेहावर सर्वोत्तम उपाय मानला जातो. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाउंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासोबतच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर दिवसात तीनदा खावी. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मधुमेह नियंत्रित राहतो.

रक्तदाबही आटोक्यात

रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहेत. जांभळाच्या बिया किंवा अर्काचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब ३४.६ टक्क्यांनी कमी होतो. त्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्समध्ये रक्तदाबविरोधी गुणधर्म असतात. याशिवाय पचनसंस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त आहेत. आतड्यातील अल्सर आणि गॅस्ट्रो इन्फेक्शन दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

जेली, सिरपही फायदेशीर -

वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते. जांभळाच्या नियमित सेवनाने केस लांबसडक होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास आवश्यक ते पोटॅशियम मिळते. जांभळे नेहमी जेवणानंतर खावी. सहसा रिकाम्यापोटी जांभळे खाऊ नयेत. कारण जांभळे खाल्ल्याने घसा व छाती भरल्यासारखी होते व अशावेळी जेवण जात नाही. तसेच कच्ची जांभळे खाऊ नये. जांभळे खाताना कीड नसलेली, व्यवस्थित पिकलेली व स्वच्छ धुतलेली जांभळे खावी.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com