हसण्यासाठी जगा : विचलितपणाचे तण ते कसदार मन!

सध्या सगळीकडं पावसाळी वातावरण आहे. कुठे पावसाची भुरभुर, कुठं टिप टिप, तर कुठं रिपरिप सुरू आहे. एकीकडं सृष्टीत हिरवे तण, तर दुसरीकडं हिरवं मन होताना दिसत आहे.
Laugh
LaughSakal

सध्या सगळीकडं पावसाळी वातावरण आहे. कुठे पावसाची भुरभुर, कुठं टिप टिप, तर कुठं रिपरिप सुरू आहे. एकीकडं सृष्टीत हिरवे तण, तर दुसरीकडं हिरवं मन होताना दिसत आहे. सृष्टीचा नियम म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय! तोच नियम मनाला देखील लागू आहे!! मनामध्ये भावभावना, विचार आणि विकार यांची उत्पत्ती आणि लय होत असतो. त्याच्यावर आधारित ‘मनाची स्थिती’ तयार होत असते. उगवण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा हा उत्तम काळ आहे. ‘उगवणे’ याबाबत आपण वेगवेगळ्या प्रकारे कायम बोलत असतो.

1) लहानपणी शाळेमध्ये उशिरा आलेल्या विद्यार्थ्याला म्हणतात ‘आत्ता उगवलास का?’ उशिरा घरी येणाऱ्या तरुणाईला घरातले म्हणतात, ‘आत्ता उगवलास का? रात्री झुलत आणि डुलत येणाऱ्या नवऱ्याला बायको विचारते ‘आत्ता उगवलात का?’

2) आकाशामध्ये काळ्या ढगांमुळं दाटून आलेलं असतं. असं अंधारलेलं वातावरण बरेच दिवस असतं. अचानक एखाद्या दिवशी सकाळी सूर्य दिसतो. मग लोक उत्साहानं म्हणतात, ‘आज सूर्य उगवला!’

3) जमिनीत पडलेल्या बीजांना पोषक वातावरण तयार होतं. नवे कोंब फुटतात. हिरवा, पोपटी रंग दिसायला लागतो. शेतीकडं पाहात लोकं म्हणतात, ‘रोपं उगवली.’

उगवण्याची प्रक्रिया नैसर्गिक आहे. पोषक वातावरण त्या प्रक्रियेला चालना देतं. फळं-फुलं देणारी झाडं, वेली उगवतात. तसंच तण देखील उगवतंच. जमिनीप्रमाणंच मनात देखील सतत पोषक वातावरण असतं. म्हणूनच त्यात सकारात्मक अथवा नकारात्मक भावभावना, विचार आणि विकार सतत उगवत असतात. त्यातलं कोणते ‘ताण’ कापायचं आणि कोणत्या ‘सकारात्मक’ भावभावनांची रोपं जोपासायची, याकडं लक्ष दिलं, तर आनंदाचं पीक मिळतं !

पीक असो वा मन, ‘लक्ष’ देण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. पण सध्याच्या काळात मन ‘विचलित’ होण्याच्या अनेक घटना होत असतात. त्रासदायक घटना, अपमान, राग, मत्सर इत्यादी गोष्टींमुळे मन विचलित होतं. तसंच, अनपेक्षित आनंददायी घटना, फायदा, कौतुक यामुळं देखील मन विचलित होतं. या घटना खालील प्रकारे घडतात.

1) अचानक येणारे फोन, अचानक ऑफिसवर भेटायला येणारी लोकं, अनावश्यक मेसेजेस, ईमेल्स, टीव्हीवरच्या ‘भाकड’ सिरियल्स, नकारात्मक बातम्या त्रासदायक असतात. त्या चित्त विचलित करतात. त्यावर ताबा नसतो. यावर उपाय म्हणून अनावश्यक मेसेज ‘म्युट’ करणं, ‘ब्लॉक’ करणं, ईमेलला फिल्टर लावणं, अपॉइंटमेंटनुसार काम करणं, कोणत्या वेळात कोणत्या चॅनलवर काय पाहायचं हे अगोदरच ठरवण्यातून विचलित करणाऱ्या गोष्टींवर ताबा मिळवता येतो.

2) चहाच्या कट्ट्यावर, पानाच्या ठेल्यावर, भिशीच्या ग्रुपमध्ये गप्पा रंगतात. काही लोक सोशल मीडियावर, तर काही व्हिडिओ गेममध्ये रंगून जातात. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’मुळं क्लिक केलेल्या विषयाप्रमाणं असणाऱ्या गोष्टी इंटरनेटवर तुम्हाला पुन्हा-पुन्हा दिसायला लागतात. या गोष्टी मनाला आनंद देतात, पण त्या जगण्याच्या मूळ ध्येयापासून चित्त विचलित करतात.

म्हणूनच चांगल्या आयुष्यासाठी ‘विचलितपणाचं ‘तण’ काढलं, तर ‘कसदार मन’ नक्की तयार होईल!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com