

प्राचीन भारतात, भिक्षा मागण्याची प्रथा आध्यात्मिक परंपरेचा एक भाग होती. भिक्षा मागण्याचे एक महत्त्वपूर्ण अंग असे आहे, की तुम्हाला भीक्षेत जे काही मिळते, तेच तुम्ही ग्रहण करता; तुमच्या आवडी-निवडीचा त्यात प्रश्न नसतो. पूर्वीच्या काळी, कोणी आध्यात्मिक साधक आपल्या दारी भिक्षा मागण्यासाठी येणे आणि आपण त्याला अन्नदान करू शकणे ही एक महद्भाग्याची गोष्ट समजली जात असे.
आजच्या काळात मात्र या परंपरेचा अयोग्य वापर केला जातांना दिसतो. कित्येक लोक आध्यात्मिक साधकांच्या वेषामध्ये निव्वळ आपले पोट भरणे आणि पैसा कमावणे याच्या मागे लागलेले आढळतात; अध्यात्माशी त्यांचा काही संबंध नसतो. पण प्राचीन काळी लोक जाणिवेच्या पातळीवर सजग राहून भिक्षा मागत; तेव्हा त्याला एक निराळा अर्थ होता आणि त्यातून एक नवी शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकत होती.
कोणी तुमच्या समोर भीक्षेसाठी हात पुढे केला, पण दिलेल्या दानाचा गैरवापर केला जाईल असे जर तुमच्या लक्षात आल्यास त्याला नकार देण्यात काही वावगे नाही. पण तुम्हाला असे वाटले. की कोणी एक भिक्षुक खरोखरच गरजू आहे तर मात्र तुम्ही, एक माणूस म्हणून, त्याला यथायोग्य प्रतिसाद नक्कीच द्यायला हवा. तुम्ही स्वतःला एकदा त्या भिक्षुच्या जागी ठेऊन बघा; मग तुमच्या लक्षात येईल की भर रस्त्यात कोणासमोर हात पसरणे किती अवघड काम आहे. तो खरेच कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असेल, हे मग तुमच्या लक्षात येईल. एक गरजू भिकारी आपल्या दीन-हीन अवस्थेमुळे अशा परिस्थितीतून जातो; पण एक ‘संन्यासी’ मात्र आपली आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी जाणीवपूर्वक भिक्षा मागतो, जेणेकरून त्याच्यामधील ‘मी’पणाची भावना कमी होईल. भिकाऱ्याकडे असा कुठलाच महान उद्देश नसतो. तो केवळ आपले पोट भरण्यासाठी भिक्षा मागतो कारण तो स्वतःची उपजीविका कमावण्यास असमर्थ असतो.
आपण लक्षात घेतले पाहिजे की अपंगत्व हे केवळ शारीरिक नसते. ज्याचे हात किंवा पाय निकामी झाले असतील तोच केवळ अपंग; असे नाही. तुमचे जीवनाबद्दलचे विचार, दृष्टिकोन आणि अनुभव घेण्याची क्षमता हे देखील अपंग किंवा दुबळे होऊ शकतात. खरेतर, जगातील बहुतांश लोक मानसिक आणि भावनिक स्तरावर अपंग आहेत; आणि याचे कारण म्हणजे - त्यांची विचार करण्याची चाकोरीबद्ध पद्धत आणि जीवनाचा सीमित अनुभव. अशाचप्रकारे, एक भिकारी सुद्धा, मानसिक स्तरावर स्वतःलाच कोंडीत पकडतो आणि भीक मागणे हाच उपजीविकेचा सर्वांत सोपा उपाय आहे, असा त्याचा समज होऊन बसतो.
एक आध्यात्मिक साधक भिक्षा मागतो कारण त्याला त्याचा ‘मी‘पणा कमी करायचा असतो. ‘माझे घर, अन्न, पैसा, माझी उपजीविका मी स्वतः कमावतो,’ ही भावना तुमच्या अहंकाराचा एक मोठा भाग आहे. तुमची स्वतःची उपजीविका कमावण्याची क्षमता, कुठेतरी, तुमचा अहंभाव देखील वाढवत असते. म्हणून भिक्षा मागणे हे, पूर्वीच्या काळी, स्वतःचा ‘मी’पणा कमी करण्याचे साधन म्हणून वापरले गेले. तुम्ही अगदी जेमतेम कमावत असाल, किंवा कोणी मोठे सत्ताधीश असाल; पण कमावण्याची पात्रता असून देखील तुम्ही संपूर्ण सजगतेने दुसऱ्यासमोर भीक्षेसाठी हात पसरता, तेव्हा तुमच्यामधील ‘मी’पणा नक्कीच कमी होतो. हा मनुष्यामध्ये घडणारा एक प्रचंड बदल आहे. म्हणून आपल्या आध्यात्मिक परंपरेत वर्षातून कमीतकमी एकवेळ अन्नाची भिक्षा मागायला जाण्याची प्रथा आहे. तसे केल्याने तुमच्या लेखी तुमचेच वाढलेले महत्त्व जरा कमी होईल. किती लोक तुम्हाला अन्नदान देतात की नाही, हे महत्त्वाचे नाही. पण आध्यात्मिक उन्नतीसाठी एक भिक्षुक बनणे ही एक लहान बाब मात्र नक्कीच नाही...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.