
विज्ञानामध्ये आधी ज्ञान मिळवले जाते आणि त्याच्या जोरावर विश्वास ठेवला जातो.
चेतना तरंग : ज्ञान आणि विश्वास
विज्ञानामध्ये आधी ज्ञान मिळवले जाते आणि त्याच्या जोरावर विश्वास ठेवला जातो. अध्यात्मामध्ये आधी विश्वास ठेवायचा, मग ज्ञान मिळू लागते.
एक उदाहरण सांगतो. शेतीसाठी रासायनिक कीटकनाशके आणि रासायनिक खते वैज्ञानिक शोधामधून निर्माण झाली. त्यांच्या उपयुक्ततेबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि जगभर ती शेतीसाठी वापरली जाऊ लागली. त्यानंतर अनके वर्षांनतर विज्ञानातून नवे असे कळले, की ही रसायने अजिबात चांगली नाहीत. मग लोकांचा त्यांच्यावरील विश्वास संपला आणि सर्वजण सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरू लागले. हाच प्रकार अँटिबायोटिक औषधांच्या बाबतीत घडला.
एक विशेष ज्ञान प्राप्त झाल्याने विश्वास निर्माण झाला, पण ते ज्ञानच बदलले तेव्हा विश्वासही बदलला. विज्ञानातून मिळणारे ज्ञान आणि त्यायोगे होणारा विश्वास हे अलग अलग घटनांवर अवलंबून असतात. पूर्ण विकसित जीवनविषयक आणि कायमस्वरूपी ज्ञान वा विश्वास हा विज्ञानामधून शक्य नसतो.
अध्यात्मामध्ये आधी विश्वास जोपासावा लागतो आणि त्यानंतरच ज्ञान लाभते. सुदर्शन क्रिया, प्राणायाम, योगासने, ध्यान आदीमध्ये तुम्हाला आधी विश्वासाने यावे लागते आणि मगच ज्ञान मिळवता येते. उदाहरणार्थ, तुम्ही पूर्ण श्रद्धेने प्राणायाम करू लागलात, की त्यायोगे प्राणाचे ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. ध्यानसाधना पूर्ण विश्वास ठेवून कराल तर चैतन्याबद्दल ज्ञान मिळेल. विश्वासाच्या सहाय्याने एक अडाणी माणूसदेखील असे गहन ज्ञान प्राप्त करू शकतो.
विज्ञान हे वस्तुनिष्ठ आहे. ते जिवंत माणसांनादेखील एक भौतिक वस्तू म्हणून पाहते. त्याउलट अध्यात्म प्रत्येक गोष्टीमध्ये जीव पाहते. पृथ्वीला माता मानते, नद्या आणि पर्वतांनादेखील जिवंत व्यक्ती मानते.
विज्ञान जीवनाला वस्तू मानते.
अध्यात्म वस्तूंनादेखील जिवंत मानते.
Web Title: Sri Sri Ravi Shankar Writes Knowledge And Faith
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..