चेतना तरंग : भावनांवर आवर घालायला शिका!

sri-sri-ravi-shankar
sri-sri-ravi-shankar

तुम्ही पहिल्यांदा सायकल चालवायला शिकताना, ‘‘मी एखाद्या दगडावर आपटणार नाही ना,’’ असे तुमच्या मनात आले, की खरोखरच तुम्ही दगडावर जाऊन आदळाल! तणाव असले तर असू द्या. त्याने काय होणार आहे? ताणतणाव हे आपल्या जीवनाचे अविभाज्य भागच आहेत. जीवनात कधी ताणतणाव येतात, तर कधी प्रसन्नता येते. या सगळ्यांना स्वीकारून पुढे मार्गस्थ व्हा. भूतकाळाचे चिंतन करण्यात निरर्थक वेळ दवडू नका किंवा दुसऱ्यांचे दोष काढत बसू नका. असल्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला काय वाटते? तुमच्या घरी कचरा टाकायला एक कुंडी असते. तुम्ही घरातला सगळा कचरा त्यात टाकता. परंतु, ती कचराकुंडी तुमच्या घरात नसल्यास सगळा कचरा घरभर विखुरलेला राहील. म्हणूनच, कचरा टाकण्यासाठी घरात एखादी जागा हवी म्हणजे घर स्वच्छ राहील. त्याप्रमाणेच जीवनात ताणतणाव निर्माण झाले, काही त्रुटी निर्माण झाल्यास त्याचा फारसा बाऊ न करता त्यांना एका बाजूला करा आणि जीवनात पुढे चाला. त्या कचराकुंडीत डोके घालत बसू नका.

एक लक्षात घ्या. कोणतेही कार्य तणावमुक्त नाही. एकतर तुम्ही ताणतणाव तुमच्यासाठी निर्माण करता किंवा इतरांसाठी निर्माण करता. ताणतणाव हे तुमच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतात. जीवनात येणाऱ्या आव्हानांकडे ताण म्हणून बघायचे, का त्या आव्हानांचा स्वीकार करून आत्मविश्वासाने त्यावर मात करायची, हे तुम्ही ठरवायचे असते. तुमचे भलेच होईल, याची खात्री तुमच्या मनात असली, की तुमचे मन निरभ्र राहते. व्यवसायात नेहमीच चढ-उतार येत असतात. ते येतील आणि जातील. व्यवसाय हा भावनेच्या भरात करायचा नसतो, तर बुद्धीने करायचा असतो आणि दानधर्म हा बुद्धीने करायचा नसतो, तर हृदयातून करायचा असतो. सेवा नेहमी हृदयातून करायची असते आणि व्यवसाय डोक्याने करायचा असतो. या दोघांत तोल सांभाळण्याचे काम मात्र शहाणपणाने करायचे असते. एखाद्या भावुक व्यक्तीला व्यवसाय करणे कठीण जाते, हे मी समजू शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यापारात भावनेच्या भरात वाहून चालणार नाही. पण, भावनांना आवर घालण्याची सवय तुम्हाला लावून घेतली पाहिजे. तुम्हाला व्यावहारिक होणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे दानधर्म रिक्त हस्ताने होत नाही. देण्यासाठी काहीतरी तुमच्या जवळ असणे आवश्यक असते. तुमच्याकडे देण्यासारखे काहीच नसेल, तर इतरांना तुम्ही काय देणार? पण, ईश्वरावर तुमचा भरवसा असेल, वैश्विक नियमांवर तुमचा विश्वास असेल; तर बाकी कसली काळजी करण्याचे कारण नाही. सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातील. 
ठीक आहे!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com