चेतना तरंग : स्पष्ट उद्देश आणि प्रगती...

Sri Sri Ravishankar
Sri Sri Ravishankar

संकल्प आणि विचार यांच्यामुळेच जग निर्माण झाले आहे. संकल्पच नष्ट झाल्यास जग लयाला जाईल. संकल्प पूर्णत्वास गेल्यावर त्यातूनच पुढे मोक्ष किंवा मुक्ती मिळते. आपले सर्व जीवन उद्दिष्टांनीच भरलेले आहे. प्रत्येक पाऊल काही उद्देशानेच टाकले जाते. पाणी प्यायचे असल्यास तुम्ही स्वयंपाकघरात जाता. गाडी चालवायची असल्यास गाडीत येऊन बसता. मनातही लाखो उद्देशांचे काहूर माजलेले असते. त्या उलट-सुलट विचारांनी मन त्रस्त होऊन जाते. 

मनातले एकमेकांच्या विरुद्ध असलेले विचार एकमेकांना काटशह देत असतात. त्यामुळे मनाचा खूप गोंधळ उडतो. तुम्ही धड पुढेही जात नाही आणि मागेही येत नाही. बऱ्याच लोकांच्या मनात असे विचारचक्र चालू असल्याने त्यांचा विचका आणि गोंधळ उडतो. आता तरी जागे व्हा! अशा विचारांमुळे तुम्हाला कोणतीच गोष्ट सुखदायी ठरणार नाही. निवड करण्यासाठी तुमच्यापाशी पर्याय कुठे आहेत? तुम्हाला वाईट किंवा अतिशय वाईट यामधूनच निवड करायची आहे. याची जाणीव तुम्हाला होईल, तेव्हाच तुमच्या मनात घोंगावणारे विचारांचे काहूर शांत होईल व आराम मिळेल. तुमच्यातली जागृत झालेली सजगता निवड करण्याच्या पर्यायामागे लागणार नाही. कसलीही निवड न करता जागृत झालेली सजगता म्हणजेच आनंदमय स्थिती असते. या अवस्थेत कसलाच गोंधळ नसतो. पण ज्या क्षणी तुम्ही कसली निवड करण्याचा प्रयत्न कराल, त्याच क्षणी तुमची शांती भंग होईल, आनंद नष्ट होईल, आणि मन:शांती बिघडेल.

या जगाची प्रगती उद्देशांमुळेच होते. परंतु तुमच्या विचारांच्या जंजाळात तुम्हीच गुरफटून जाता. यातून तुम्हालाच बाहेर पडायचे आहे. जागे व्हा आणि विचारांच्या मोहजाळ्यामधून बाहेर पडा. तुमच्यात निर्माण झालेली आवड किंवा घृणा हे तुमच्या मनाचेच खेळ असतात. हा सगळा विचारांचाच खेळ आहे हे समजल्यावर तुमचे मन मोकळे होईल, दडपण नाहीसे होईल. विचारांना तुम्ही वास्तव समजता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही गुंतता. वास्तव आणि तुम्ही यामध्ये विचार असतात. ही बंधने तोडून टाका, विचारांच्या पगडातून बाहेर पडा म्हणजे, अमुक एक गोष्ट सुरेख आहे हे तुम्ही विचारांच्या मदती शिवाय मान्य करू शकाल.विक्षेप आणि एकाग्रता यांचा मनाशी संबंध असतो. एकाग्रता आणि चलबिचल यांच्या पलिकडे स्वत्त्वाचे अस्तित्व असते. चैतन्य हे कधीही बदलत नाही. ते सतत शुद्ध आणि पवित्रच राहते. चैतन्य एकदा पूर्णपणे समजले की तुम्हाला ध्यानधारणेची सुद्धा गरज भासणार नाही. अगदी ‘समाधीची’ सुद्धा गरज भासणार नाही. किंबहुना कसलीच गरज भासणार नाही. तुम्ही सगळ्याचाच त्याग करू शकाल. एकदा का तुम्ही तुमची लालसा, अपेक्षा यांच्या पगड्यामधून बाहेर पडलात, की आपोआप स्वत्वाच्या साम्राज्यात दाखल होता. तिथे तुमच्याभोवती कसली कुंपणे नसतात किंवा तुमच्यावर बंधने नसतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सगळ्या संकल्पना नष्ट झाल्यावर, कसली बंधने राहणार नाहीत, काही कर्म करायची गरज भासणार नाही, उलट तुम्ही या सगळ्यातून मुक्त व्हाल. मन आपोआप शांत होईल, प्रसन्न राहील, शुद्ध राहील, कोणत्याच गोष्टीमुळे त्याची चलबिचल होणार नाही. अशा स्थितीत तुम्हाला ध्यानधारणेचीही आवश्यकता भासणार नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com