चेतना तरंग : गुरू हेच द्वार

गुरूच्या द्वारातून आत प्रवेश केलात, की तुम्ही स्वगृही पोचला आहात. इथून तुम्हाला जग एका वेगळ्याच अर्थाने पाहता येते.
Sri Sri Ravishankar
Sri Sri RavishankarSakal

समजा तुम्ही मार्गावर हरवला आहात, भरकटत आहात, वादळ, मोठा पाऊस, जोराचा थंडगार वारा सर्व आहे रस्त्यावर आणि तुम्ही निवारा शोधत आहात. शोधता शोधता तुम्हाला एक द्वार दिसते. हा दरवाजा खूप आकर्षित करणारा, स्वागत करणारा आणि आनंदित वाटतो आहे आणि याहून आकर्षित काहीही दिसत नाही, म्हणून तुम्ही त्या दरवाजाजवळ पोचता.

गुरूच्या द्वारातून आत प्रवेश केलात, की तुम्ही स्वगृही पोचला आहात. इथून तुम्हाला जग एका वेगळ्याच अर्थाने पाहता येते. या दरवाजाच्या आतूनही तुम्हाला बाहेरच्या वादळाचा आणि मुसळधार पावसाचा आवाज येतो, पाऊस दिसतो. पण आता त्यामुळे तुम्ही बेचैन होत नाही. इथे आत सुरक्षेची उबदार जाणीव होते. इथून जग अधिकच सुंदर दिसते. इथून जग भयानक वाटत नाही, ते प्रेम, साहाय्य आणि करुणेने भरलेले दिसते. इथे आल्यावर तुमचे भय अदृश्यच होते. गुरूची आवश्यकता का असते? जेव्हा तुम्ही गुरूच्या नजरेने हे सर्व जग पाहू लागता, तेव्हा तुम्ही गुरूपर्यंत पोचला आहात, असे समजावे. पण जर तुम्ही अजूनही जगाला पूर्ववत, तुमच्याच दृष्टीने पाहत असाल, तर याचा अर्थ तुम्ही गुरूपाशी पोचला नाही आहात. तुम्ही अजूनही रस्त्यावर उभे राहून भिजत आहात, थंडीने कापत आहात. तुम्ही गुरूद्वाराकडे पाहत असाल, पण त्यातून आत प्रवेश केला नसेल अजून.

‘गुरूच्या नजरेतून पाहणे’ याचा अर्थ काय? जेव्हा कधी कोणताही प्रसंग, कुठलीही समस्या समोर उभी ठाकते, तेव्हा तुम्ही विचार कराल, ‘या प्रसंगी गुरू कसे वागले असते? त्यांनी या समस्येचा सामना कसा केला असता?’ जर कुणी गुरूला नावे ठेवली, त्याच्यावर आरोप केले तर त्यांनी काय केले असते?

गुरूच्या अस्तित्वाची जाणीव होऊ द्या, हेच गमक आहे. गुरू हा संबंध नाही. तो एक अस्तित्व आहे. नातेसंबंध कधी तुटतात. परत जुळतात आणि पुन्हा तुटू शकतात. प्रत्येक नाते संबंधात अपेक्षा, वासना अथवा द्वेष असतातच. हेच तर संसारचक्र आहे. हेच तर या जगाचे दुःख आहे. नाते संबंधात तोड-मोड होते. ते उलटे होत राहतात. उलट अस्तित्व मात्र विशाल, अखंड, अबाधित आणि एककेंद्रात स्थिर असते.

गुरूला नातेसंबंधाच्या नजरेने पाहू नका. ‘गुरुजींनी माझ्याकडे पाहिले’, ‘गुरुजींनी मला नाही पाहिले’, ‘ओह, गुरुजी मला अमुक म्हणाले’, ‘गुरुजी माझ्याशी बोलले नाहीत’, ‘मी गुरुजींच्या नजीक नाही, उलट तो दुसरा त्यांना जवळचा आहे.’- या प्रकारचे क्षुद्र विचार, हा कचराच नाते मानल्याने येत असतो.

गुरुद्वारातून आत प्रवेश करा आणि स्वगृही या. कारण केवळ गुरूच्या अस्तित्वामुळे तुमचे जीवन समाधान व तृप्तीने भरून जाईल, कृतकृत्य वाटेल तुम्हाला आणि तुमच्या सर्व नाते-संबंधातसुद्धा समाधान भरून राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com