चेतना तरंग : ध्यान आणि ‘साधना’

Sri Sri Ravishankar
Sri Sri Ravishankar

ज्ञानेंद्रियांच्या सुखापासून मनाला वारंवार दूर न्या. ते एकाच ठिकाणी केंद्रित करा. त्याला वारंवार आत्मतत्त्वावर केंद्रित करा. ईश्वरी चेतनेपर्यंत पोचा. भयमुक्त व्हा. ईश्वरी साम्राज्यात स्थिर व्हा. आत्मतत्त्व ही ज्ञानेंद्रियांनी कळणारी वस्तू नाही. ज्ञानेंद्रियांनी जे कळत असते त्याचा अनुभव घ्यायचे काम आत्मतत्त्व करते. म्हणून इकडे तिकडे धाव घेणाऱ्या मनाला सतत आवर घाला. इतर गोष्टीतून सुख, आनंद मिळण्याच्या लालसे पोटी मन इतरत्र धावपळ करत असते. तुम्हाला सतत काहीतरी बघायचे असते, सतत ऐकावयाचे असते.

तुमच्याबद्दल लोकांनी चांगले म्हटलेले तुम्हाला ऐकायचे असते. अनेक लोकांनी तुमची स्तुती केलेली तुम्हाला जास्त प्रिय असते. ती ऐकण्यासाठी मन आतूर झालेले असते. तसेच तुम्हाला चांगल्या गोष्टी पाहायच्या असतात, त्यावर ताबा मिळवायचा असतो. त्या गोष्टीला स्पर्श करून ते स्पर्शसुख तुम्हाला उपभोगावयाचे असते, पंचज्ञानेंद्रियांपैकी वास, चव आणि स्पर्श या तीन गोष्टींना दुय्यम महत्त्व आहे, खरे महत्त्व पाहणे आणि ऐकणे यालाच आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला काही बघायचे नाही, काही पाहण्यात मला आता स्वारस्य नाही, मला काही ऐकण्यात आता रस नाही, कसली चव घेण्यात, वास घेण्यात किंवा स्पर्शसुख घेण्यात; कशातच मला गुंतायचे नाही असे ज्या क्षणी तुम्हाला वाटते त्या क्षणीच मला माझ्या मूळ स्रोताकडे परत जायचे आहे अशी इच्छा प्रकट करा आणि इकडे तिकडे भटकणाऱ्या मनाला आपल्या मूळ स्रोताकडे घेऊन जा. कौशल्याने मनाच्या भ्रमंतीला आवर घाला. ही कला तुम्हाला आत्मसात करायला हवी. ज्याप्रमाणे एखादी भाषा शिकण्यासाठी तुम्ही अभ्यास करता, कॉम्प्युटर शिकण्यासाठी, गाडी चालविण्यासाठी किंवा विमान उडविण्यासाठी तुम्हाला प्रथम शिकावे लागते, सराव करावे लागतो अगदी त्याचप्रमाणे मनाला मूळ स्रोताकडे ओढून आणण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो. यालाच ‘साधना’ म्हणतात. ही तुम्हाला मिळालेली दैवी देणगी नसते तर तुम्हाला ती प्रयत्नपूर्वक साध्य करावी लागते. वारंवार प्रयत्न करून मनाला मूळ स्रोताकडे आणण्याचा सराव तुम्हाला करावा लागतो.

भीती सोडून द्या. अज्ञात असते त्याबद्दल आपल्याला नेहमी भीती वाटत असते. आपल्या स्वत:बद्दलच आपण सर्वाधिक अज्ञानी असतो. त्यामुळे ‘आपल्याला काही होईल का? माझे कसे होईल?’ अशी भीती आपल्याला नेहमी वाटत असते. ही मनातली भीतीची भावना घालवण्यासाठी आपल्याला ईश्वराचा आधार घेण्याची आवश्यकता असते. ईश्वराच्या आधाराशिवाय ध्यानधारणा फलद्रुप होऊ शकते. लोक यांत्रिक पद्धतीने ध्यानाला बसू शकतात, ठराविक तंत्र साध्य केल्यावर तुमचे ध्यान लागू शकते, परंतु या यांत्रिक पद्धतीमुळे भीतीची भावना नष्ट होत नाही. ती जाण्यासाठी ईश्वराची मदत तुम्हाला घ्यावीच लागते. यांत्रिक पद्धतीने केलेल्या ध्यानधारणेमुळे तुमचे मन शांत होईल. परंतु भीतीमुळे तुमची ध्यानावस्था खोलपर्यंत जाणार नाही. ध्यान गाढ लागायला लागले, की एखादी अनामिक भीती जाणवायला लागेल आणि ध्यान खोलवर लागणार नाही. भीती तुमचा ताबा घेईल. परंतु ईश्वरी साहाय्याने तुमचे ध्यान मात्र खोलवर लागेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com