चेतना तरंग : महत्त्व ध्यानधारणेचे

sri-sri-ravishankar
sri-sri-ravishankar

‘साधना’ सिम कार्ड आहे आणि ‘भक्ती’ रेंज आहे. ईश्वराची प्रार्थना करूनही तो तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत नाही असे, तुम्ही म्हणता तेव्हा ‘साधनेचे’ सिम कार्ड तुमच्यात नसते. सिम कार्डाशिवाय कोणतीच प्रार्थना फळणार नाही. सत्संगामुळे तुम्ही ‘चार्ज’ होता. मंदिरे, गुरूद्वारा येथे जाऊन तुम्ही स्वत:ला ‘चार्ज’ करता. परंतु तिथे जाऊन तुम्ही भांडणे केलीत, तर शुद्ध ऊर्जेचा ऱ्हास होतो. अशा ठिकाणी ईश्वर थांबत नाही.

सगळे आनंदात असतात तिथे ईश्वर आवर्जून येतो. मन आनंदी असताना आपली कामे भराभर होतात, इतरांना आपण आशीर्वाद देऊ शकतो. त्यांना बरे करू शकतो. आपल्या सत्वातच सगळ्या शक्ती सामावलेल्या असतात. आत्मज्ञानामुळे त्या प्रकट होतात. इतरांना तुम्ही आशीर्वाद दिल्यास सर्व गोष्टी प्रकट होतील. तुमच्याकडे सेलफोन आहे, पण तुम्ही कोणताच नंबर डायल केला नाहीत तर तुमचा कोणाशी संपर्क होईल का? तुम्हाला तुमच्याशीच संपर्क साधावयाचा आहे. तुमची प्रकृती, आत्मा, परमात्मा यांच्याशी तुम्ही संधान साधल्यानंतर सगळ्याच गोष्टी प्रकट होऊ लागतील. त्यासाठी आम्ही अनेक आशीर्वाद देणारे लोक तयार केलेले आहेत. ते स्वत: आनंदी आणि प्रसन्नचित्त असतातच, पण इतरांना आशीर्वाद देऊन त्यांनाही ते आनंदी आणि निरोगी करू शकतात.

अत्यंत वाईट गाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या एका खेडेगावाचा कायापालट होऊन ते आता आदर्श खेडेगाव म्हणून ओळखले जाते. पूर्वी लोक तिथे जायला घाबरायचे. आता दररोज ७०० कुटुंबे तेथे सत्संगाला जमतात. तेथे घरांना कोणी कुलपे लावत नाहीत. तेथे दुकाने आहेत, पण त्याची देखभाल करायला कोणी नसते. लोक सामान खरेदी करतात आणि योग्य ते पैसे पेटीत टाकतात. त्या गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळते. सगळ्यांनी आपली घरे गुलाबी रंगानी रंगवलेली आहेत. लोक आपण होऊन गावात स्वच्छता राखतात. आता ते खेडेगाव आर्दा म्हणून ओळखले जाते. गावात सर्वजण सेंद्रिय पद्धतीनेच शेती करतात. गेले तीन वर्षे या पद्धतीने त्या गावात कामकाज चालू आहे. तेथे कोणी दारू पीत नाही, सिगारेट ओढत नाही. या आर्दा गावाचा कायापालट झालेला बघून आणखीन १८० गावे याच मार्गाने सध्या वाटचाल करत आहेत.

हे स्वप्न आपण वास्तवात आणू शकतो का? ते नक्कीच शक्य आहे. आपल्यापाशी सर्व काही आहे. फक्त त्यासाठी आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवले पाहिजे; त्याला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. तुमच्या सर्व काळज्या, विवंचना, ताणतणाव, दु:ख इथे सोडा आणि आनंदाने हसत हसत घरी जा, एवढीच माझी अट आहे. जीवन हे आनंदाने जगण्यासाठी असते. आपण स्वत:ही दु:खी होता कामा नये आणि इतरांनाही दु:खी करता कामा नये. तुमचे सगळे दु:ख इथेच सोडून द्या. ईश्वर आहे आणि तो तुमचाच आहे याची आठवण करून द्यायलाच फक्त मी इथे आलेलो आहे. रोज तीस मिनिटांच्या ध्यानधारणेमुळे तुम्ही तेजस्वी दिसायला लागाल. रोज तुम्ही सगळ्यांनी निदान तीस मिनिटे तरी ध्यान करा. आपण सर्वानी रोज देवळात जाऊन काही मिनिटे तरी डोळे मिटून बसायला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com