

Beating the 2026 Heatwave: Ayurvedic Wisdom for Rising Temperatures
Sakal
डॉ. मालविका तांबे
२०२६. बघता बघता परत मे महिन्याच्या दारात उभा आहे. ऋतुचक्रानुसार ऋतु बदलत राहतात आणि निसर्ग आणि मनुष्याचा एकमेकावर होणारा प्रभाव चालू राहतो. दरवर्षी पेक्षा यावर्षी गरमी जरा जास्त प्रमाणात आहे असं प्रत्येकालाच वाटतंय. तापमान प्रचंड वाढलेले आहेत. दिवसभराचा सूर्यप्रकाश नकोसा झालेला आहे. कूलर, एसी, पंखा याच्याशिवाय जगणे अगदी कठीण होत चाललेलं आहे. सतत घाम येणे, शरीरात जलांश अर्थात हायड्रेशन कमी होणे, अपचन होणे, जुलाब, उलट्या, उष्माघात असे सगळे त्रास या काळात फारच प्रमाणात दिसतात. शरीरातली अग्नि मंदावल्यामुळे खायची प्यायची इच्छासुद्धा होत नाही. एकूणच हे महिने कसे पटकन जातील याचा विचार सगळ्यांच्या मनात सतत असतो.
आयुर्वेदा प्रमाणे या काळात आहारामध्ये स्निग्ध, द्रव, शीतल व पचायला हलके पदार्थ ठेवणे चांगले. शीतल म्हणल्यावरती सगळ्यात पहिले लोकांना आठवतं ते म्हणजे फ्रिज मधलं गार पाणी आणि बाजारात मिळणारे आईस्क्रीम पण जेव्हा आपण शीतल म्हणतो तेव्हा ते जीभेला किंवा घशाला लागणार गार नव्हे तर शरीराच्या आत मध्ये शीतलता आणणाऱ्या पदार्थांबद्दल आयुर्वेद मार्गदर्शनात सांगते.