संवाद : स्तनाच्या कर्करोगाबद्दल जाणून घ्या

भारतीय स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगामधे स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकावर येतो.
Breast Cancer
Breast CancerSakal

भारतीय स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगामधे स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकावर येतो. दर वर्षी सुमारे एक लाख ६० नवीन रुग्णांची भर यात पडत आहे व जवळजवळ ८० हजार स्त्रिया या आजाराने दरवर्षी मृत्युमुखी पडतात. आपल्या देशात प्रत्येक २२ पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमधील स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

भारतातील या कर्करोगातील सर्वात वाईट भाग असा आहे की, तो तरुण स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. परदेशातील स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग वयाच्या ५०-५५ वर्षांनंतर होतो. तर, भारतीय स्त्रियांमध्ये जेमतेम ४०-४५ वर्षांमध्ये दिसतो. यापैकी १६ टक्के रुग्ण ३०-४० या वयोगटातील असतात, हा सर्वांत गंभीर भाग आपल्याकडे दिसतो.

ही लक्षणे कशी दिसतात?

स्तनामध्ये गाठ असणे, हे या कर्करोगाचे पहिले ठळक लक्षण आहे. कितीही लहान गाठ असली तरीही ती कर्करोगाची गाठ असू शकते. त्यामुळे या लक्षणांकडे महिलांना जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. स्तनाच्या निपलमधून रक्त, पाणी किंवा काळा स्त्राव येणे, ते आतल्या बाजूला ओढले जाणे किंवा काखेत गाठीचे अवधान येणे ही देखील या आजाराची संभाव्य लक्षणे आहेत.

स्व-स्तन परिक्षण

स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी स्व-स्तन परिक्षण हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. वयाच्या विशी-एकविशीनंतर प्रत्येक स्त्रीने हे परिक्षण करणे ही आता काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे ही आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी आहे. त्यातून अगदी सुरवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान शक्य असते. त्यावर प्रभावी उपचार करून रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.

वैद्यकीय तपासणी

मॅमोग्राफी हे स्तनाच्या कर्करोग तपासणीचे तंत्र आहे. वयाच्या चाळीशीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी करणे अत्यंत गरजेचे आहे. या तंत्रामुळे ३३ टक्के रुग्णांमध्ये लवकर निदान झाल्याचे निष्कर्ष वेगवेगळ्या अभ्यासातून पुढे आले आहेत. त्यामुळे या रुग्णांवर परिणामकारक उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश मिळाले असल्याचेही यात अधोरेखित केले आहे.

आधुनिक उपचार

यापूर्वी स्तनाचा कर्करोग म्हणजे स्तन पूर्ण काढून टाकला जात असे. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे स्तन संवर्धन शस्त्रक्रिया करणे आता शक्य झाले आहे. यामुळे स्त्रियांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. स्त्रिया पूर्वीप्रमाणे सहजपणे सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये मोकळेपणाने सहभागी होऊ शकतात. त्यांच्या शरीरावर या शस्त्रक्रियेचा कोणताही दुष्परिणाम स्पष्टपणे दिसत नाही. या शस्त्रक्रियेनंतर स्त्रियांना आरोग्यदायी आणि आनंदी जीवन सहजतेने जगता येते.

रुग्णाचा कर्करोग नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, हे उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे ठरते. पहिल्या तीन टप्प्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावर काही रुग्णांना केमोथेरपीही द्यावी लागते. मात्र, आधुनिक काळात जेनेटिक टेस्ट (जनुकीय चाचण्या) प्रगत झाल्या आहेत. त्यातून रुग्णाला आजार परत येण्याची शक्यता किती आहे, हे समजते.

त्यातून किमोथेरपीचा निर्णय घेता येतो. तसेच, या आजारावर विविध अद्ययावत उपचारही उपलब्ध आहेत. रुग्णाच्या कर्करोगाचा टप्पा ओळखून त्यापैकी कोणता मार्ग स्वीकारायचा या बाबतचा सल्ला कर्करोग तज्ज्ञ देऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com