

एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असल्यास पक्वान्न, गोडधोड करून, आनंद वाढविला व वाटला जातो. नवसंवत्सराची सुरुवात गोड खाण्याने करायची असल्याने हा आहे ‘गोडीपडवा’. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने, मिरे, गूळ वगैरे घालून वाटून केलेली चटणी खाण्याची प्रथा आहे. ही चटणी असते अत्यंत कडू पण ती तोंडी लावण्यापुरती खाल्ली जाते. त्यानंतर मात्र श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी असा सर्व बेत असतो. पुढे होणारे पोटभर गोडाचे जेवण बाधू नये, गोडाचा त्रास होऊ नये या दृष्टीने कडू चटणीचा उपयोग होत असावा किंवा थोडेसे कडू खाल्ल्यावर गोडाची चव अधिक गोड होत असावी. अमृतबिंदू पृथ्वीवर पडून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाचे महत्त्व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने खूप असते. सर्व जेवणात पक्वान्नाचे (पक्व अन्न) महत्त्व सर्वाधिक असते.