Lumpy skin disease : लम्पीच्या मदतीसाठी हजारो शेतकरी प्रतीक्षेत

दहा हजार जनावरांचा मृत्यू ; राज्य सरकारकडून केवळ दोन हजार पशुधनाची भरपाई
Lumpy skin disease farmers are waiting for treatment animal doctor health
Lumpy skin disease farmers are waiting for treatment animal doctor health sakal

मुंबई : ओल्या दुष्काळाने त्रस्त शेतकरी पशूंना होणाऱ्या लम्पी चर्मरोगाने देखील हवालदिल झाला असून राज्यात जवळपास १० हजार पशुधन या रोगाने दगावले असले तरी केवळ २ हजार २०४ पशुधनांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ७ हजार १३६ मृत पशुधन पडताळणी पूर्ण होऊनही लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांवर भरपाईसाठी वाट पाहणेच नशिबी आले आहे.

मागील दोन महिन्यात पशुधनावर आलेल्या लम्पी रोगाने राज्यात १० हजार जनावरे दगावली आहेत. लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या पालकांना ताबडतोब आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली खरी, प्रत्यक्षात मात्र हजारो शेतकऱ्यांना ही मदत मिळावी यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक जिल्ह्यांना ओल्या दुष्काळाने घेरलेले असताना घरातले पशुधनही लम्पीने दगावल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास कमालीची दिरंगाई सुरू असल्याचे ‘सकाळ’कडे आकडेवारीमुळे स्पष्ट होत आहे.

राज्यात ९ हजार ८४२ पशुधन लम्पी चर्मरोगाने दगावले आहेत. त्यापैकी ७ हजार १३६ जनावरांची पडताळणी पूर्ण झाली असली तरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केवळ २ हजार ७२३ जनावरांची पडताळणी केली. जवळपास ५ हजारांपेक्षा अधिक जनावरांची अद्याप पडताळणी केलेली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ९६ हजार ८६२ गाई आणि बैल याना लम्पी आजाराची लागण झाली आहे. तर सर्वाधिक मृत्यू बुलडाणा जिल्ह्यात १,१३० नोंदले गेले आहेत.

पशुधनाचे नुकसान व भरपाई

मृत पशुधनाची संख्या ः ९ हजार ८४२

पडताळणी पूर्ण ः ७ हजार १३६

नुकसान भरपाईसाठी सादर प्रस्ताव ः ३ हजार ६९४

समितीने मंजूर केलेल्या पशुधनाची संख्या ः २ हजार ७२३

नुकसान भरपाई अदा केलेले पशुधन ः २ हजार २०४

एकूण अदा रक्कम ः ५ कोटी ६२ लाख १५ हजार

जनावरांना जाहीर केलेली मदत

दुभती गाय ः ३० हजार रुपये

भाकड गाय आणि बैल ः २५ हजार

वासरू ः १६ हजार

लम्पीपासून पशुधनाला वाचवण्यासाठी आणि त्यांच्या उपचारावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. लम्पी आजाराने दगावलेल्या पशुधनाच्या पालकांना तातडीने त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत. जनावरे दगावल्याची खात्री असेल तर भरपाई देण्यास सरकारने दिरंगाई करू नये.

- डॉ. अजित नवले, नेते, किसान सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com