Corona Mental Health :कोरोनाच्या टेन्शनला द्या सुट्टी !

कोरोना, मंदी सगळ्याच्या टेन्शनमधून सुटण्याचे हुकुमी फंडे
Corona tension
Corona tensionSakal

करोना येणारे, मंदीचं सावट आहे, आता पुढे काय, परत टाळेबंदी, परत मास्क आणि परत ती औषधं... असे अनेक प्रश्न आणि चिंता तुम्हालाही भेडसावत असतील ना...

पण या साऱ्यावर एकच उपाय आहे,

हर फिक्र को गोली मार यार....

या सबकुछ अनसर्टन परिस्थितीत कसं शांत राहायचं सांगतायत. मानसोपचारतज्ज्ञ डॉ  सागर मुंदडा.

चीनमध्ये करोनाच्या केसेस वाढतायत. त्याच्या बातम्या बाहेर आल्या आणि सगळं जग पुन्हा एकदा खडबडून जागं झालं. करोना पुन्हा येणार का, हीच भीती सगळ्यांना वाटायला लागली.

पुन्हा करोना म्हणजे पुन्हा टाळेबंदी

पुन्हा हॉस्पिटलमध्ये गर्दी

बेडसाठी मारामारी

आर्थिक मंदी

मंदीमुळे नोकऱ्यांवर परिणाम होणार का

पैशांचं गणित कसं जमवायचं

 बापरे किती हे प्रश्न... पण हे प्रश्न अनेक सामान्यांना पडतायत. हळूहळू हे प्रश्न आणि त्यामागची भीती आपल्याही डोक्याचा ताबा घेऊ लागली आहे. अशा या सगळ्या अनिश्चिततेच्या परिस्थितीत शांत कसं राहायचं. मानसिक आरोग्य चांगलं कसं राखायचं याबद्दल आम्ही बोललो, थेट मानसोपचारतज्ज्ञ सागर मुंदडा यांच्याशी...

How to deal with tension
How to deal with tensionSakal

अनिश्चितता सगळ्याचं मूळ

मानवी मन आणि मेंदूला भीती असते ती अनिश्चिततेची. आपल्याला निश्चितता आवडते.

कारण त्यात एक शाश्वती असते. आपण उद्या काय करणार हे आज मेंदूला माहिती असेल की तो निवांत असतो.

पण तेच उद्याचा पत्ताच नसेल तर मेंदूची, मनाची धावपळ सुरू होते. म्हणूनच ही अनिश्चितता त्याला नको असते.

कोविड म्हणजे तर अनिश्चिततेचं दुसरं नाव.

ही लाट येणार की नाही, ती कितपत धोकादायक असेल, कितीजणांना संसर्गित करेल, औषधं मिळतील का, बेड मिळतील का, टाळेबंदी लागणार का, अशा कुठल्याच प्रश्नांची उत्तरं सध्या कोणाकडेच नाहीत.

कारण ती देताच येणार नाहीत. पण त्याचं टेन्शन तर येतंय. मन ताण तर घेतंय.

आता करायचं काय?

Corona tension
Corona Update : कोव्हीड प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई विमानतळ सज्ज !

नकोशा पाहुण्याचं स्वागत

मेंदूला मनाला अनिश्चितता आवडत नाही, पण कोविडकाळाचा ती अविभाज्य भाग आहे. मग टाळता येणारच नाही. अशावेळी तिला डोक्यातून हुसकावून लावण्यासाठी सगळी एनर्जी घालवण्यापेक्षा तिचं स्वागत करा. म्हणजे काही हारतुरे घेऊन उभे राहा असं नव्हे तर काय करायचं ते पुढे पाहा.

आपल्याला नेमकी कसली भीती वाटतेय, ते शोधून काढा.

आपल्या मनात या भीतीपोटी येणारे किमान १० विचार, १० गोष्टी शोधा आणि लिहून काढा.

आता याच्यात वर्गीकरण करा.

  • यातल्या कोणत्या गोष्टींवर आपण उपाय शोधू शकतो

  • कोणत्या गोष्टींवर उपाय शोधणं, आपल्या हातात नाही.

  • ज्यावर उपाय शोधू शकतो, ते करण्याकडे आधी लक्ष द्या.

  • उदा. व्यायाम, आहार याकडे लक्ष देणं आपल्या हातात आहे. ते करा. मास्क लावणं आपल्या हातात आहे ते करा.

  • ज्यावर आपण एकटे काहीच करू शकत नाही. ते चक्क सोडून द्या. त्याकडे दुर्लक्ष करा.

  • उदा. टाळेबंदी होणार की नाही, मला आजारी पडल्यास रुग्णालयात बेड मिळणार की नाही, कोविडचे नियम लोकांनी पाळले की नाही. इ.

  • ज्या समस्या आपल्या नियंत्रणात आहेत, त्या सोडवण्यावर आधी भर द्या.

  • किती काही केलं तरी ज्या समस्यांवर आपले काहीच नियंत्रण नाही, ते सोडून देण्यातच भलं आहे. कारण जिथे बदल घडवू शकत नाही, तिथे नुसताच ताण घेऊन काय उपयोग आहे.

ढवळ्या शेजारी पवळ्या

संगत महत्त्वाचीच. ती म्हण नाही का, ढवळ्याशेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला.. गंमत सोडा पण खरोखरच तुमच्या आसपासच्या लोकांचे गुण लागतात तुम्हाला अहो. ज्या पाच लोकांच्या तुम्ही सतत संपर्कात असता, त्यांची मनस्थिती तुमच्या मनस्थितीवर परिणाम करते.

त्यामुळे आनंदी लोकांच्या सान्निध्यात राहा. सतत चिंता न करणाऱ्या लोकांची संगत राखा. म्हणजे निर्लज्ज किंवा बेजबाबदार नव्हे. तर असे लोक जे जबाबदारी घेतात पण अतीताण घेत नाहीत.

सतत नकारात्मक बोलणाऱ्या, सतत फुकाची काळजी करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. कारण तुम्हीसुद्धा तशाच मनस्थितीत जाता. अती काळजी करू लागता. जी करून परिस्थितीत बदल होत नाहीच मात्र तुमचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं.

Be Happy
Be HappySakal

कळतंय पण वळत नाही.

एखादा विचार सतत डोक्यात येतोय. डोकं भंडावून सोडतोय. त्याचा उपयोग नाही, आपण त्यावर काही करू शकत नाही. तरीही तो विचार थांबवू शकत नाही, असं जेव्हा होतं तेव्हा काय करायचं.

अशी कळतंय पण वळत नाही, अवस्था असेल तर मग त्या विचाराला मनातून हाकलून देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. त्या झगड्यात आणखी थकवा येईल.

त्याऐवजी वेगळ्या गोष्टीत मन रमवता येईल का याचा विचार करा. त्यासाठी पर्याय शोधा. वाचन करा. संगीत ऐका. चालायला जा. स्वयंपाक करा. बागकाम करा. खूप मार्ग आहेत.

एवढं करूनही नसतीलच जात मनातून हे नकारा्तमक विचार तर मात्र मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

psychiatrist help
psychiatrist helpSakal

मुळात मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांचा सल्ला घेणं, ट्रीटमेंट घेणं म्हणजे काहीतरी भयंकर हे डोक्यातून काढून टाका. जसा ताप येतो. सर्दी होते. तसंच हे आहे. मनाला छोटेमोठे आजार होत असतात. होऊ शकतात.  मग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेताना लाजण्याची गरज नाही.

डॉक्टर्स काय करतात?

  • डॉक्टर काही लगेच तुम्हाला सिनेमात दाखवतात तसे वीजेचे शॉक देणार नसतात. किंवा वेड्यांच्या इस्पितळात डांबणारही नसातात.

  • सगळ्यात आधी रुग्णाला काही श्वसनाचे प्रकार शिकवले जातात. काही सेशन्स ते केल्यानंतर कसा परिणाम होतो आहे, ते पाहिले जाते.

  • त्याचा उपयोग नाही झाला तर समुपदेशनातून आणखी ट्रीटमेंट दिली जाते.

    त्यानंतर औषधे दिली जातात.

  • औषधांबाबत गैरसमज असतात. उदा. त्याने किडनी खराब होते, अत्याचं व्यसन लागतं. इत्यादी.

  • पण ही औषधं देणारे तज्ज्ञ डॉक्टर असतात, हे आपण लक्षात घ्यायला हवं. औषधं तेव्हाच दिली जातात, जेव्हा त्याची गरज असते. शिवाय बहुतांश रुग्णांच्या बाबतीत जास्तीतजास्त वर्षभर औषधं दिली जातात. त्यानंतर ते डोस बंद केले जातात.  

  • अगदीच टोकाच्या केसमध्ये परिस्थिती बदलू शकते.

लोक मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला प्रचंड उशीर करतात. डॉ. सागर मुंदडा म्हणतात, आपण हाड मोडल्यावर हाडाच्या डॉक्टरांकडे गेलो आणि म्हणालो, आता ऑपरेशनशिवायच हे नीट करा. तर होईल का? मग मनाचंही तसंच आहे. जेव्हा मन तुम्हाला काहीतरी संकेत देत असतं. तेव्हाच ती हाक ऐका. तज्ज्ञांची मदत घ्या. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर ती पूर्ववत करण्यासाठी औषधांचा आधार घेणं क्रमप्राप्त असतं. त्याचं तुम्हाला व्यसन लागू नये,  तुमच्या शरीरावर त्याचा अपाय होऊ नये, यासाठी आम्ही डॉक्टर जास्त काळजी घेत असतो.

मुक्त जगा आनंदी जगा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com