

From Fear to Fortitude: Spiritual Insights on Overcoming Inner Anxiety
Sakal
गुरुदेव श्री श्री रविशंकर
निसर्गाने सर्व सजीवांमध्ये काही प्रमाणात भीती दिलेली आहे. ही भीती जीवनाला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सावध बनवते. सावधपणा आणि भीती यामध्ये प्रमाणाचा फरक असतो. कमी असेल तर त्याला सावधपणा म्हणतात; जास्त असेल तर ती भीती बनते. तुम्ही काही अर्थपूर्ण कामात व्यस्त असता, ध्यान करता, ज्ञानात रममाण होता, तेव्हा भीती कमी होते आणि फक्त सावधपणा उरतो. भीती तुमच्या शरीरात काही संवेदना निर्माण करते. तुम्ही जागरूकतेने निरीक्षण करता, तेव्हा प्रथम भावना संवेदनामध्ये रूपांतरित होते, आणि नंतर ती संवेदना मुक्त होते आणि मन हलके होते. हे निरीक्षणच एक ध्यानाची पद्धत आहे. ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे तर विश्रांती आहे; एकाग्रता हे त्या साधनेचे केवळ एक फलित आहे. ध्यान करताना, विचार येऊ द्या आणि जाऊ द्या. जसे तुम्ही अधिक विश्रांतीत जाता, तसे तुम्ही आपल्या आतल्या खोल जागेत पोहोचता. मन बंधनांपासून मुक्त होते, तेव्हा अंतर्ज्ञान, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता उगम पावतात. तेव्हा तुम्हाला संपूर्ण विश्वाशी एकरूप झाल्यासारखे वाटते.