इनर इंजिनिअरिंग - दारातले भूत

एका छोट्या गावात एक जुने घर होते, ज्याला लोक भुताचे घर म्हणून ओळखत असत. त्या घरात जाण्याची कोणाची हिंमत नव्हती.
haunted house
haunted housesakal
Updated on

एका छोट्या गावात एक जुने घर होते, ज्याला लोक भुताचे घर म्हणून ओळखत असत. त्या घरात जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. एक दिवस एका धाडसी माणसाने जाहीर केले, की तो एक संपूर्ण रात्र त्या घरात घालवणार आहे.

संध्याकाळी तो त्या घरात रात्रभर राहण्यासाठी गेला. दुसऱ्या एका माणसाला वाटले, की तो पहिल्या माणसापेक्षा जास्त धाडसी आहे, त्यानेदेखील त्या रात्री त्या भुताच्या घरात रहायचे ठरवले. पहिला माणूस आधीच घरामध्ये पोचलेला असताना दुसरा माणूस तिथे येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला.

त्या दुसऱ्या माणसाने धक्का देऊन दरवाजा उघडायला सुरुवात केली, तेव्हा पहिल्या माणसाला वाटले, भूत आले आहे, म्हणून तो खांद्याने जोर लावत दरवाजा बंद करू लागला. बाहेरच्या माणसानेही दरवाज्याला खांदा भिडवत दरवाजा उघडण्याचे शक्य तितके सगळे प्रयत्न सुरू केले. ही खटपट बराच वेळ सुरू राहिली. दोघांना वाटत होते, की दुसऱ्या बाजूला भूत आहे. सगळी रात्र अशीच या खटपटीत गेली. पहाट उगवली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती दोघेही एकमेकांसारखीच दोन माणसे आहेत.

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. लोकांना वाटते, ते चांगले आहेत आणि ते वाईट लोकांशी भांडत आहेत. मुळात, दोन्ही बाजूच्या लोकांना वाटते, की दुसऱ्या बाजूचा माणूस वाईट आहे. लोक नेहमी समजतात, की ते स्वतः चांगले आहेत आणि दुसरे कोणीतरी वाईट आहे.

याच प्रकारे ते त्यांचे या जगातले उद्दिष्ट पार पाडत असतात. ज्या माणसाला जग अतिरेकी म्हणते, त्याला वाटते की तो चांगला आहे. तो स्वतःला जितका चांगला समजतो, तितका तो आपल्यासाठी भयानक होऊ लागतो. कोण चांगले आहे आणि कोण वाईट आहे हे मुळात तुम्ही स्वतःची ओळख कशी निर्माण करता यावर अवलंबून आहे. मग तो धर्म असो अथवा देश अथवा इतर काहीही.

मुळात, प्रत्येकाने आधी स्वतःवर काम करण्याची गरज आहे. स्वतःच्या अंतर्मनावर नियंत्रण मिळवणे आणि आनंदी व्यक्ती होणे ही प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी असायला हवी. तुम्ही आनंदी असता, तेव्हा तुम्ही खूप उदार असता. हो की नाही? तुम्ही दुःखी असता तुम्ही एक धोकादायक व्यक्ती असता. म्हणून स्वतः आनंदी होणे ही तुमची सगळ्यात प्राथमिक जबाबदारी आहे.

हे असे झाले नाही, तर कितीही चांगला हेतू असला तरी आपण जगाला मोठ्या दुःखात टाकू, जे सध्या जगात सुरू आहे. तुम्हाला स्वतःचे शरीर, मन किंवा भावना सांभाळता येत नसतील, तर तुम्ही जग कसे काय सांभाळणार? तुम्हाला स्वतःची काळजी घेता येत नसेल, तर निश्चितच तुम्हाला जगाची काळजी कशी घ्यायची ते माहीत नसेल. म्हणून प्रत्येक माणसाने सगळ्यात आधी स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे, ही त्याची प्राथमिक जबाबदारी आहे. जगाला आयुष्याचा अर्थ उमगलेली चांगल्या अंतरंगाची माणसे हवी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.