

Benefits of earth soil and Ayurveda in health
sakal
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाच्या माध्यमातून, पृथ्वीपासून विलग झालेल्या पाण्याची भेट जेव्हा पुन्हा पृथ्वीवरील मातीशी होते तेव्हा त्या मिलनाचा आनंद सुगंधरूपाने प्रत्येक मनुष्याला अतिशय मोहीत करतो. जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध असले तरी मातीच्या सुगंधाला तोड नाही. माती ही पृथ्वीतत्त्वाची निदर्शक किंवा पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे पृथ्वीचा सूक्ष्म गुण गंध आहे. तसाही ज्यावेळी कुठलाही वास येतो तो वास त्यात असलेल्या पृथ्वीतत्त्वाचा असतो. झाडे, फुले, धातू मातीतूनच तयार झालेले असतात व त्यात असलेले मातीचे अस्तित्व गंधरूपाने प्रकट होते. प्रत्येक वास हा मातीच्या गंधामुळेच असतो. जुईच्या फुलांचा वास मोगऱ्याच्या फुलांच्या वासापेक्षा वेगळा असला तरी त्यात असलेला वास असण्यासाठी तेथे मातीचा वास (अस्तित्व) असावा लागतो. गंध हा पृथ्वीचा महत्त्वाचा गुण. योगशास्त्रानुसार मेरुदंडाच्या तळाशी असलेल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी पृथ्वीतत्त्वाचे प्राबल्य असल्यामुळे त्यावर ध्यान करत असताना पृथ्वीतत्त्वाचा सोनेरी रंग व पृथ्वीतत्त्वामुळे त्या ठिकाणी सुगंध येतो. ज्यावेळी शरीरातील पृथ्वीतत्त्व शुद्ध होते त्यावेळी सर्व शरीराला सुगंध येऊ लागतो. हा शरीराचा सुगंध इतरांनाही येऊ शकतो.