मनुष्य १०० वर्षोंचे आयुष्य घेऊन जन्माला आलेला असतो, असे अध्याहृत धरून आयुर्वेदामध्ये आयुष्याच्या एकंदर तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल, मध्य आणि जीर्ण असे वयाचे तीन विभाग केलेले आहेत. त्यातील १६ ते ६० वर्षांचा सर्वांत मोठा कालखंड ‘तारुण्या’चा होय..पण तारुण्य हे फक्त वयावर ठरते का? या प्रश्र्नाचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. आपले शरीर आकारबद्ध, निरोगी ठेवावे व दिसावे असे वाटणे; कपड्यांविषयी आवडनिवड सांभाळावी आणि त्या वेळी आपण समाजात चालू असलेल्या फॅशनच्या थोडे पुढे असावे असे वाटणे; स्वतःच्या केशरचनेविषयी जागरूक असणे; शरीर व त्वचा कांतिमान दिसावी अशा प्रयत्नात असणे; आपल्याला चारचौघात मिसळता यावे व इतरांना आपल्या सहवासाचे आकर्षण वाटण्याच्या हेतूने गप्पा-गोष्टी व चातुर्य दाखवणे; आपल्या अस्तित्वाचा व शरीराचा सुगंध दरवळेल याकडे लक्ष ठेवणे; कुठल्याही प्रसंगात भाग घेणे, मदत करणे, अवघड कामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे; बुद्धिचातुर्य दाखवणे अशा माध्यमातून आपण तरुण असल्याची (वाढलेले वय लपवूनसुद्धा) जाणीव सतत इतरांना करून देत राहणे म्हणजे तारुण्य!.सतत चार चौघांत राहावे व त्यातही आपण केंद्रबिंदू असावे अशी कल्पना मुख्यतः तरुणपणात असते (पुढे याच गोष्टीचा विपर्यास अहंकारात होऊ शकतो). तसेच तरुणपणी दुसऱ्याचा द्वेष करण्याऐवजी मनाने स्पर्धात्मक स्वभाव स्वीकारलेला असतो. बाह्यवातावरण किंवा इतर व्यक्तींची टीका वा निंदानालस्ती न करता स्वतःच्या विकासाकडे व अडचणीवर मात करण्यावर कल असतो. तेव्हा तरुण दिसण्यासाठी या गोष्टी लक्षात घेऊन तसे वागावे लागते. सळसळते रक्त, कामाचा जोश, वागण्यातील ऊब व त्यामुळे जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा उत्सव करण्याची प्रवृत्ती तारुण्यात दिसून येते..सर्वसामान्यपणे व्यक्तींचे वय कितीही झालेले असले तरी वरील वर्णनाप्रमाणे काळजी घेतल्यास ती व्यक्ती तरुण दिसते. शरीराची, कपड्यांची, डोळ्यांची योग्य काळजी घेतली, तसेच योग्य वेळी आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले उपचार व खाणे-पिणे ठेवले तर वय वाढले तरी काही मर्यादेपर्यंत शरीर तरुण दिसते व मानसिक तारुण्यही शेवटच्या क्षणापर्यंत टिकवता येते.अर्थात बऱ्याच वेळा पाठीला बाक आला, शरीर वाताचे दिसू लागले म्हणजे हाडे दिसू लागली, डोळे खोल गेले, केस विरळ झाले, नको त्या भागावर वाढलेली चरबी लटकलेली दिसू लागली, चालताना बोलताना श्र्वास लागू लागला की मग तरुण दिसण्याच्या प्रयत्नात हाफ-पँट, टी-शर्टसारखे कपडे, केसांना कलप व डोळ्यांवर गॉगल वगैरे सर्व जामानिमा करून हातात बॅडमिंग्टनची रॅकेट घेऊन उभे राहिले तर आणलेल्या तारुण्याच्या सोंगामुळे इतरांना विदूषकाचा प्रत्यय येऊ शकतो व लोकांना जरी उघडपणे हसता आले नाही तरी हास्यास्पदच ठरू शकते..पण त्या उलट वयाने, शरीराने तरुण असताना उगाचच ढगळ-पगळ कपडे, कालबाह्य फॅशन व प्रौढपणाने वागणे हेसुद्धा बरे नाही. बऱ्याच वेळा वयाने तरुण असणारी मुले-मुली स्वतःचे तारुण्य दाखवण्याच्या प्रयत्नात काहीतरी क्षिप्त-विक्षिप्त कपडे वापरणे, विचित्र केशरचना करणे किंवा शरीरप्रदर्शन करताना दिसतात, पण यामुळे तारुण्य दिसण्याच्या ऐवजी पोरकटपणाच जास्ती दिसतो.तारुण्य ही एक शक्ती आहे. ही शक्ती प्रत्यक्ष दिसली नाही तरी कार्यरूपांतरणामुळे तिचा झटका कळतोच! स्त्री-पुरुषातील आकर्षण हाही तारुण्यशक्तीचा एक गुण आहे. घरात असलेल्या विजेचा पॉइंट त्याला लावलेल्या आकर्षक व तेजस्वी दिव्यामुळे जसे लक्ष वेधून घेतो व सौंदर्य वाढवतो तसेच अंतर्गत असलेली तारुण्यशक्ती सुंदर शरीर, त्यावर चढवलेली वस्त्राभूषणे आणि रंगकांती यामुळे उठून दिसते व एकूणच जीवनाची शोभा व आकर्षकता वाढवते. जीवनाचे सौंदर्य आणि भविष्यकाळाला आश्र्वासित करण्याची जबाबदारी तरुण-तरुणींवर असते तेव्हा प्रत्येकाने तरुण राहणे तर गरजेचे आहेच, पण ‘तरुण दिसणे’ तेवढेच महत्त्वाचे आहे..त्वचा निरोगी असली तर आपोआपच सुंदरही असतेच. त्यामुळे नाना प्रकारचे साबण, क्रीम वापरून त्वचा सुंदर करण्याच्या नाहक प्रयत्न करण्यापेक्षा त्वचा निरोगी ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरेल. त्वचा ही वातदोषाचे राहण्याचे एक ठिकाण असल्याने तिच्या ठिकाणी कोरडेपणा वाढणार नाही याकडे विशेष लक्ष द्यायला लागते. त्यासाठी जमले दररोजच अन्यथा आठवड्यातून किमान १-२ वेळा तरी अंगाला शुद्ध केलेले, औषधांनी सिद्ध केलेले तेल लावावे.त्वचेच्या तारुण्यासाठी दुसरे वरदान म्हणजे अंघोळीच्या वेळेला उटणे वापरणे. अनंतमूळ, आवळा, हळद, दारुहळद, ज्येष्ठमध वगैरे वर्ण्य द्रव्यांसह मसुराचे पीठ किंवा बेसन एकत्र करून तयार केलेले उटणे स्नानाच्या वेळी साबणाच्या ऐवजी वापरावे. अंघोळीचे पाणी फार गरम नसावे व थंडही नसावे. असे उटणे सलगपणे आठवडाभर स्नानाच्या वेळी वापरल्यास निश्र्चितच त्वचेवर फरक जाणवायला सुरुवात होईल..तेजस्वी व स्वच्छ डोळे देखील तारुण्य व आरोग्य दोघांचेही प्रतीक असतात. डोळ्यांच्या सौंदर्यासाठी काजळ लावले जाते. आयुर्वेदिक काजळ घातल्यास सौंदर्याबरोबर डोळ्यांचे आरोग्यही नीट राहते, दृष्टी व्यवस्थित राहायला मदत मिळते. टी.व्ही. सतत पाहिल्याने, कॉम्प्युटरवर फार वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येऊन अकाली चष्मा लागला की तेही सौंदर्याला बाधक ठरू शकते. असे होऊ नये यासाठी आयुर्वेदिक काजळ वापरणे श्रेयस्कर होय..शिवाय असे काजळ शीत गुणधर्माचे असल्याने कॉम्प्युटरच्या प्रखर स्क्रीनकडे पाहताना डोळ्यांचे रक्षण होण्यासाठी तसेच प्रदूषणातून वाहने चालवणाऱ्यांच्या डोळ्यांचे धूर-धुळीपासून संरक्षण होण्यासाठी असे काजळ वरदानच असते. पुरुषमंडळींना काजळाचा काळा रंग आवडत नाही त्यामुळे काजळाऐवजी त्यांनी ‘अंजन’ वापरावे. हे रंगविरहित असते व वरील सर्व फायदे देते.वेषभूषा व्यक्तिमत्वाला उठाव देणारी असावी, आपल्या व्यवसायाला साजेशी असावी. मात्र एकंदर ‘तरुण’ दिसायला हवे असेल तर फ्रेश रंगाचे कपडे वापरावेत. मळकट, धुरकट रंग टाळावेत. कपड्यांच्या रंगाबरोबरच ते स्वच्छ, नीटनेटके असावेत.(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.