
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरून जळगाव आणि धरणगाव तालुक्याला जोडणाऱ्या गिरणा नदीवरील पुलास समांतर असणाऱ्या बांभोरी आणि निमखेडीदरम्यानच्या नवीन बंधारा कम पुलास बुधवारी (ता. १७) राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. जुन्या महामार्गावरील पूल म्हणून तो प्रचलित आहे. (Approval of new parallel bridge over Girna river 40 crore fund approved Jalgaon Latest Marathi News)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागून असणाऱ्या बांभोरी- निमखेडी- जळगाव- आसोदा- भादली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५९ वरील ४/५०० किलोमीटरवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या पुलामुळे महामार्गावरील एकमेव पुलावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीला आळा बसण्यासाठी उपयोग होणार असून, सोबत वाळूच्या उत्खननालाही चाप बसणार आहे.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा पूल मंजूर करून आणला असून, त्याला राज्याच्या अर्थसंकल्पातून निधीही मिळणार असल्याने लवकरच त्याचे काम मार्गी लागणार आहे.
४० कोटींचा प्रस्ताव
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी, यातून होणारे अपघात आणि एकंदरितच त्रास दूर व्हावा, यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री पाटील यांनी बांभोरी ते निमखेडीदरम्यान गिरणा नदीवर ४० कोटी निधीचा बंधारायुक्त समांतर पूल बांधण्याच्या कामाचा पाठपुरावा सुरू केला होता, त्यास यश आले आहे.
पर्यायी पुलामुळे सुविधा
सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव शहर ते बांभोरी गाव यांना जोडणारा गिरणा नदीवर एकच पूल आहे. दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे विस्तारीकरण झाले असले, तरी हा पूल अरूंद असल्याने येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे येथे नवीन पूल हवा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासनाकडे सादर करण्यात आला होता.
अर्थसंकल्पात तरतूद
बुधवारी अर्थसंकल्पातील निधीच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या असून, यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागून असणाऱ्या या पुलाचे बांधकाम करण्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्यात आली आहे.
पाण्याचा प्रश्नही सुटणार
या पुलामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळेल. यासोबत बांभोरी आणि निमखेडी परिसरातील लोकांना मुख्य पुलावर न येता सुरक्षितपणे गिरणा नदी पार करता येईल. विद्यापीठासह परिसराला नेहमी पाण्याची समस्या भेडसावत असते. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीत वाहून जाणारे पाणी साठविण्यात आल्याने विद्यापीठासह परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.