जळगाव : अनेक वर्षांपासून रखडलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याची निविदाप्रक्रिया होईल, त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी शुक्रवारी (ता. ३) येथे दिली.
मोदी सरकारच्या (Modi govt) आठ वर्षेपूर्तीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या गेल्या आठ वर्षांतील प्रभावी योजनांचा सर्वसामान्यांना लाभ झाल्याचा दावाही त्यांनी केला.
आठ वर्षांपूर्वी केंद्रात नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने राबविलेल्या जनधन, पंतप्रधान आवास, उज्ज्वला गॅस, आयुष्मान भारत, प्रत्येक गावात वीज यांसारख्या तळागाळापर्यंत पोचलेल्या योजनांचा श्रीमती खडसे यांनी आढावा घेतला.
गेल्या महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या चौपदरीकरणाची पुन्हा घोषणा केली. त्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, की गेल्या वर्षात मी आणि त्याआधी (कै.) हरिभाऊंनी या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या रस्त्याचे सर्वेक्षण झाले असून, डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या काळात लवकरच निविदाप्रक्रिया होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
बायोफर्टिलायझरला अनुदान
शेतकऱ्यांसाठीही किसान सन्मान, यूरिया व फर्टिलायझरवर अतिरिक्त अनुदान, प्रधानमंत्री फळपीक विमा यांसारख्या योजना उपयुक्त ठरत आहेत. रासायनिक खतांच्या वापराला पर्याय म्हणून बायोफर्टिलायझर समोर येत आहे. मात्र, त्यावर सरकारने अनुदान द्यावे, अशी सूचना मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केली असून, त्यांची ही भावना आपण प्रधानमंत्री, केंद्रीय कृषिमंत्र्यांपर्यंत पोचविणार असल्याचे श्रीमती खडसे यांनी सांगितले.
महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस महेश जोशी, विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, मनोज भांडारकर आदी या वेळी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.