बऱ्हाणूपर- अंकलेश्‍वरचे चौपदरीकरण नाहीच! भूसंपादन खर्चिक 

बऱ्हाणूपर- अंकलेश्‍वरचे चौपदरीकरण नाहीच! भूसंपादन खर्चिक 
Updated on

जळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी चार वर्षांपूर्वी घोषणा करूनही बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागलेला नाही. यामागचे खरे कारण म्हणजे या मार्गात येणारी अनेक गाव-शहरे. प्रत्येक ठिकाणी उड्डाणपूल, बायपास शक्य नाही, शिवाय काही ठिकाणी वनक्षेत्रातून जाणाऱ्या या मार्गालगतची जमीनही सुपीक त्यामुळे भूसंपादन खर्चिक. म्हणून या मार्गाच्या चौपदरीकरणाचा विचार महामार्ग प्राधिकरणाने सोडून दिल्याचे वृत्त आहे. 

तीन राज्यांना जोडणारा दुवा म्हणून बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर या चारशे किलोमीटर टप्प्यातील मार्गाचा उल्लेख होतो. परंतु, चार- पाच वर्षांपासून या रस्त्याचे चौपदरीकरण तर दूरच, रुंदीकरण व मजबुतीकरणाचे कामही प्रलंबित आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते, नंतर स्थिती ‘जैसे थे’ होते. गडकरी २०१४ ला केंद्रात रस्ते वाहतूकमंत्री झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांना त्यात वर्ग करून चौपदरीकरणाचा धडाका लावला. २०१६ च्या जळगाव दौऱ्यात त्यांनी केलेल्या विविध योजनांच्या घोषणांत बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश होता. 

अद्याप मुहूर्त नाही 
गडकरींनी घोषणा केलेल्या महामार्गांचे काम प्रलंबित राहत नाही, असा अनुभव आहे. त्यानुसार नवापूर- अमरावती महामार्गातील जळगाव जिल्ह्यातील टप्पा, औरंगाबाद- जळगाव महामार्गाचे काम मार्गी लागले. परंतु, अंकलेश्‍वर रस्त्याचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. 

चौपदरीकरण नाहीच 
घोषणा होऊन पाच वर्षे झालीत, तरी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागलेला नाही. याबाबत सखोल माहिती घेतली असता चौपदरीकरणाच्या कामात येणाऱ्या अडचणींमुळे महामार्ग प्राधिकरणाने त्याचा विचारच सोडून दिल्याचे समोर आले आहे. अर्थात, त्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात येत. 

या आहेत अडचणी 
- बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर हा चारशे किलोमीटरचा मार्ग राज्य महामार्ग असून त्याचे क्षेत्र तीन राज्यांत आहे. 
- अगदी बऱ्हाणपूरपासून मार्गाचा विचार केला, तर थेट अंकलेश्‍वरपर्यंत हा मार्ग असंख्य गावे, शहरांमधून जातो. 
- इतर कोणत्याही मार्गांत लागणाऱ्या गाव- शहरांपेक्षा या मार्गावरील गावांची संख्या कितीतरी अधिक आहे. 
- या प्रत्येक गावातून उड्डाणपूल अथवा वळणरस्ता (बायपास) काढणे अत्यंत जिकरीचे, खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे आहे. 
- एकट्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर रावेर शहर व तालुक्यातील विवरे, निंभोरा ही गावे, सावदा व फैजपूर शहर, पुढे यावल शहरासह तालुक्यातील गावे, चोपडा तालुक्यातील धानोरा, अडवाद, चोपडा शहर यासह अन्य अनेक गावांमधून हा मार्ग जातो. 
- महामार्गाच्या दुतर्फा अत्यंत सुपीक, बागायती जमीन आहे. तसेच काही ठिकाणी वनक्षेत्रही असल्याने चौपदरीकरणात पर्यावरणाची मोठी हानी होईल. 
- समृद्ध जमीन असल्याने संपादनासाठी मोठ्या प्रमाणात मोबदला द्यावा लागेल, ते तुलनेने प्रचंड खर्चिक आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com