महामार्गाच्या कामात अनेक अडथळे; जिल्हाधिकाऱ्यांनी दखल, आणि दिल्या सुचना

महामार्गाच्या कामात अनेक अडथळे; जिल्हाधिकाऱ्यांनी दखल, आणि दिल्या सुचना

जळगाव ः शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे महापालिका, वीज कंपनीने व यंत्रणांनी तातडीने दूर करावेत, जेणेकरून महामार्गाचे काम गतीने पूर्ण करता येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी (ता. १२) येथे दिल्या. 

‘शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण मार्चपर्यंत पूर्ण होणे दिवास्वप्न’ अशी बातमी प्रसिद्ध झाल्या होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केल्यानंतर महामार्गाच्या कामात अडथळे असल्याचे म्हटले होते, त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत ही बैठक बोलविली होती.

 
जळगाव शहरातील रस्ता सुरक्षा व ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. 

महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) किरण सावंत-पाटील, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे, उपअभियंता स्वाती भिरुड, एसटी, वीज वितरण कंपनी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
 

वीज कंपनी, महापालिकेला ताकीद 
जिल्हाधिकारी म्हणाले, की जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी वीज वितरण कंपनीने रस्त्यावरील जुन्या वाहिन्या व खांब तातडीने काढून घ्यावेत. महापालिकेने महामार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ महापालिकेच्या घंटागाड्या घनकचरा संकलनासाठी रस्त्यावर उभ्या असतात ते इतरत्र हलवावे. महामार्गावर पथदीप बसविण्यासाठी नगरोत्थान अथवा जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तातडीने सादर करावा. 
 

संयुक्त कारवाईच्या सूचना 
अजिंठा चौफुलीपासून पुढे रस्त्यावरच ट्रक दुरुस्तीचे काम केले जाते. महामार्गाच्या दोन्ही बाजूस विक्रेते दुकान मांडून वस्तूंची विक्री करतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या कामात अडथळे येतात. याबाबत पोलिस, परिवहन व महापालिकेने संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना या वेळी दिल्या. 

हेही वाचा- ‘अंकल रायसोनी ॲन्ड गँग’ला सर्व आरोप अमान्य; राज्यभर ८१ गुन्हे !


खड्डे त्वरित बुजवावेत 
शहरातील खड्डे मंगळवारच्या बैठकीत चांगलेच गाजले. महापालिकेमार्फत शहरातील रस्त्यांची कामे करताना अमृत योजना, पाणीपुरवठा व मलनिस्सारणाची कामे करताना रस्ते खोदताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो दोन्ही कामे एकाच वेळी होतील याबाबत नियोजन करावे. त्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती करावी. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com