Jalgaon News : शहरातील बसस्थानकासमोरील मुख्य राज्यमार्ग व बाजारपेठेतील अतिक्रमण पालिकेच्या पथकाने काढल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. ही कार्यवाही शनिवारी (ता. २४) करण्यात आली.
राज्य महामार्ग १५ वर अतिक्रमण, हातगाड्या, अवैध प्रवासी वाहने यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांना तसेच नागरिकांना त्रास होत होता. (Jalgaon Encroachment on main road to Amalner was removed)
त्यामुळे मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्यासोबत संयुक्त कारवाई करीत जेसीबी मशीनने बसस्थानकासमोरील दुकानदारांचे अतिक्रमित ओटे, पत्र्याचे शेड, टपऱ्या आदी अतिक्रमणे काढून टाकली.
तिरंगा चौक, पाचपावली मंदिर, पैलाड चौफुली, आण्णाभाऊ साठे चौक, महाराणा प्रताप चौक, स्वामिसमर्थ चौक, बसस्टँड आदी ठिकाणी विक्रेते रस्त्यात व्यवसाय करू लागल्याने ग्राहकांच्या मोटरसायकली रस्त्यावर उभ्या राहतात.
बसस्थानकाजवळ टॅक्सी व रिक्षा चालकांच्या नियोजित जागे व्यतिरिक्त काही अवैध प्रवासी वाहने, फळविक्रेते दोन्ही बाजूला उभे राहत असल्याने देखील वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानक चौक, स्वामी समर्थ मंदिर चौक परिसरात शाळा सुटताना व भरताना कोंडी होऊन मुलामुलींना सायकल काढणे देखील त्रासदायक होते. किरकोळ धक्का, अपघात यामुळे वाद होतात.
नगरपालिका ते पाचपावली देवी मंदिर रस्त्यावर मुख्य बाजारात देखील काही दुकानदारांनी व्यापारी संकुल सोडून बाहेर हातगाड्या व शेड वाढविले होते. त्यामुळे ग्राहकांना मोटरसायकल नेणेही अवघड होते.
तर काही दुकानदारांनी किरकोळ विक्रेत्यांना दुकानाबाहेरील रस्त्यावरील जागा भाड्याने दिल्याचे समजते. म्हणून वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेत किरकोळ अतिक्रमणे काढली आहेत.
"सुरवातीला अतिक्रमणधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. वाहतुकीला अडथळे अथवा रस्त्यात अडथळे निर्माण करणाऱ्यांचे साहित्य जमा करून कारवाई केली जाईल."- विकास देवरे, पोलिस निरीक्षक, अमळनेर
"शहरातील सर्वच रस्त्यावरील टपरीधारक व अतिक्रमणधारकांना सुरुवातीला सूचना दिल्या जातील. त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे. नंतर कारवाई केली जाईल."- तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद
"पालिका व पोलिस प्रशासनाने घेतलेली भूमिका योग्य असून, कारवाईत सातत्य असले पाहिजे. अनेकदा अतिक्रमण काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते."- किशोर पाटील, सामान्य नागरिक