जळगाव : संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाकडे जाणारा एक रस्ता अद्यापही पारतंत्र्यात आहे. खानदेश सेंट्रलच्या ले- आउट मंजुरीनंतर कायद्याने स्वाभाविकत: वापरासाठी खुल्या होणाऱ्या या गोविंदा रिक्षाथांबा ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर सुरक्षा रक्षकांकडून दादागिरी केली जात आहे. याबाबत अनेकदा तक्रारी होऊनही महापालिका प्रशासनही गुलामगिरीत असल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.
जळगाव शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या खानदेश सेंट्रलच्या विस्तीर्ण परिसरात महापालिकेने याआधीच ले- आउटला मंजुरी दिली असून त्या ठिकाणी व्यावसायिक संकुले उभारण्यात आली आहेत. त्यानुसार या परिसरातील सर्व रस्ते सार्वजनिक वापरासाठी खुले होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीनेच तत्कालीन जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी रेल्वे स्थानकाची संरक्षक भिंत तोडून हा रस्ता रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला केला होता.
.. तरीही रस्ता बंदच!
काही दिवस रस्ता खुला झाल्यानंतर त्याठिकाणी खानदेश सेंट्रलची मालकी असलेल्या राजमुद्रा रिअल इस्टेटने या रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेड लावले, सुरक्षा रक्षकही ठेवले. रेल्वे स्थानकात येणाऱ्यांसाठी पार्किंगवरही राजमुद्राच्या ठेकेदारांनी कब्जा केला. आणि हा रस्ता वापरासाठी बंद करण्यात आला. याबाबत वेळोवेळी बोंब उठल्यावर तेवढ्यापुरता काही दिवसांसाठी तो खुला होतो आणि पुन्हा बंद करण्यात येतो.
सुरक्षा रक्षकांची ‘दादा’गिरी
याठिकाणी राजमुद्राने ही खासगी मालमत्ता असल्याचे फलक लावून सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. तात्पुरते लोखंडी गेटही लावले असून तैनात सुरक्षा रक्षक या रस्त्यावरून कुणालाही ये- जा करू देत नाहीत. कुणी वाद घातला तर दादागिरी करतात.
नगररचनाचा आदेश केराच्या टोपलीत
या रस्त्याबाबत काही कार्यकर्त्यांनी गतकाळात आंदोलन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. त्यानंतर नगररचना विभागाने या रस्त्यासह या परिसरातील सर्वच रस्ते वाहतुकीसाठी आठ दिवसांत खुले करण्याचे आदेश दिले. त्या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
‘दादा’गिरीचे अनेक बळी
रात्री- अपरात्री रेल्वे स्थानकावरून ये- जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना या परिसरातील दादागिरीचा अनुभव येतो. अनेकांना वेठीस धरले जाते. साधारण दोन-तीन दशकांपूर्वी काही शहरांमध्ये एखाद्या भाईगिरी करणाऱ्या दादाच्या गल्लीत जाण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागत असे, किंवा त्या रस्त्यावरुन ये- जा करण्यास मनाई असे.. तसाच प्रकार या ठिकाणी अनुभवायला मिळतो.
मनपा हतबल.. कार्यकर्ते कुठंय?
वारंवार तक्रारी होऊनही महापालिका प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई करायला तयार नाही. पोलिस दलाचा वाहतूक विभागही उदासीन आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असताना रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्याची हिंमत दाखविणारे कथित सामाजिक कार्यकर्ते खानदेश सेंट्रलमधील या रस्त्याबाबत अशी भूमिका घेतील का? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित होतोय.
नियम काय सांगतो?
प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीनुसार एखाद्या भूखंडावर ले- आउट मंजुरी व सीमांकनानंतर त्यातील व लगतचे सर्व रस्ते सार्वजनिक वापरासाठी आपोआपच खुले होतात, असे स्पष्ट नमूद आहे. त्यानुसार हा रस्ता रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी खुला व्हायला हवा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.