Jalgaon News : सर्वसामान्य लोकांपैकी सुमारे दहा टक्के लोकांमध्ये किडनीसंबंधी कुठली ना कुठली समस्या असण्याची शक्यता असते. हीच समस्या दीर्घकाळ राहिल्यास भविष्यात किडनी निकामी होण्याचे कारण ठरू शकते. हे टाळण्यासाठी वर्षातून एक किंवा दोन वेळा तपासणी आवश्यक आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. अनेकांना किडनी स्टोनचे विकार होतात. (Jalgaon kidney problems in 10 percent of people)
अशा रुग्णांनी अधिकाधिक पाणी पिणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. पूर्वी वयस्कर लोकांमध्येच किडनी निकामी होण्याचे प्रमाण दिसून यायचे. हल्ली मात्र हे वय कमी झाले आहे. आजच्या घडीला किडनी निकामी झाल्यानंतर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये अगदी १० पासून ते ८५ वयापर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे.
सर्वसामान्य लोकांपैकी दहा टक्के व्यक्तींमध्ये किडनीसंबंधी कुठली ना कुठली समस्या असू शकते. यात नेफ्रोटिक सिंड्रोम (लघवीतून प्रोटीन जाणे), मूत्रमार्गाचे इन्फेक्शन, प्रोस्टेस्ट ग्रंथींचा आजाराचा समावेश आहे. यात किडनी निकामी होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, किडनी विकारांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. योग्य व्यायाम, खानपान व्यवस्थित ठेवल्यास व्यक्ती किडनी विकारांपासून दूर राहू शकतो. (latest marathi news)
काय काळजी घ्याल
-दिवसाला किमान तीन लिटर पाणी पिणे
-धूम्रपान, मद्यपान टाळावे
-वजन नियंत्रणात ठेवणे
-नियमित व्यायाम
-रक्तदाब, मधुमेह असल्यास वर्षात दोनदा तपासणी
-चाळिशी ओलांडणाऱ्यांनी वर्षात एकदा तपासणी करावी
किडनी निकामी होण्याची कारणे
-मधुमेह
-जन्मतः किडनीचे आजार
-अनुवंशिक आजार
-डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय वेदनाशमक औषधींचे सेवन
-अशुद्ध पाणी पिणे
-प्रोटीन पावडर, स्टेरॉईडचा वापर
ही आहेत लक्षणे
-हात, पाय, चेहऱ्यावर सूज
-दम लागणे
-लघवीचे प्रमाण कमी होणे
-उलटी, मळमळ
-जेवण कमी जाणे
-झोप कमी येणे
-रक्तदाब वाढणे
"रुग्णांना कुठली ना कुठली समस्या असण्याची शक्यता असते. यात किडनी निकामी होण्याचे शक्यता अत्यल्प आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. ज्या रुग्णांची किडनी दहा ते पंधरा टक्क्यांपेक्षा कमी काम करते, अशाच रुग्णांना डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण करण्याची गरज पडते. एकूण शंभर रुग्णांपैकी दहा टक्के रुग्णांना डायलिसिसची गरज पडते." -डॉ. मनोज टोके, किडनीविकार तज्ज्ञ