
जळगाव : वाढत्या अपघातांमुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण कसेबसे पूर्ण होतेय... भुयारी मार्गाच्या ठिकाणी समांतर रस्तेही बनविले गेले.. पण, अतिक्रमणाच्या विळख्याने हे समांतर रस्ते गिळंकृत केले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह महापालिका व पोलिस यंत्रणा याबाबत कमालीची उदासीन आहे.
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड लोकवस्ती वाढल्यामुळे वाहनांची संख्याही हजारोंच्या संख्येने वाढली. त्यामुळे स्वाभाविकच महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढून अपघात वाढले व त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ लागली. त्यातून अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होताना समांतर रस्ते तर झाले नाही, पण महामार्ग चौपदरीकरण दोन वर्षांत गती देऊन पूर्ण करण्यात आले.
निरुपयोगी समांतर रस्ते
महामार्गाचे खोटेनगर ते कालंकामाता चौक या सात मार्गातील टप्प्याचे चौपदरीकरण करण्यात आले. त्यात दादावाडी, गुजराल पेट्रोलपंप, अग्रवाल चौक व प्रभात चौकात भुयारी मार्ग (अंडरपास) करण्यात आले आहेत. या मार्गालगत समांतर रस्तेही बनविण्यात आले असले, तरी या समांतर रस्त्यांना लागून अतिक्रमण होऊ लागल्याने ते निरुपयोगी ठरत आहेत.
अग्रवाल चौकात कोंडी
महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल चौकात समांतर रस्ता करण्यात आला असून, मु. जे. महाविद्यालयाच्या बाजूने या रस्त्यावर ऊस, फळ व भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. थेट तंत्रनिकेतनपर्यंत वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल थाटले जात असून, वस्तू घेण्यासाठी वाहनधारक रस्त्यावरच वाहने लावत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
बेशिस्त वाहनचालक
या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झालेली असताना एकलव्य क्रीडा संकुलाकडून येणाऱ्या रस्त्यावरील वाहनधारक थेट विरुद्ध दिशेने (राँग साइड) अग्रवाल हॉस्पिटलपर्यंत वाहने वेगाने दामटत येतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जे नियमाने वाहन चालवितात अशा वाहन धारकांची कोंडी होऊन वाहतूकही ठप्प होते.
संयुक्त कारवाई आवश्यक
या तीनही यंत्रणांनी मिळून संयुक्त कारवाई करत हे अतिक्रमण काढून समांतर रस्ते प्रत्येक ठिकाणी मोकळे करावेत. अन्यथा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा व समांतर रस्त्यांच्या निर्मितीचा उद्देशच सफल होणार नाही, अशी संतप्त भावना वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.
सर्व यंत्रणा उदासीन
यासंदर्भात अनेकदा वृत्त प्रसिद्ध होऊनही उपयोग झालेला नाही. महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग याबाबत सुस्त आहे. महामार्गालगतचा विषय असल्याने शहर वाहतूक पोलिसांनी याबाबत हात झटकल्याचे दिसून येते. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही रस्ता तयार करुन दिला, आता त्यावरील अतिक्रमणाचा विषय आमचा नाही, असा पवित्रा घेत डोळे बंद करुन घेतलेत. अशा स्थितीत सामान्य वाहनधारकांचा जीव मात्र धोक्यात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.