अमळनेर : शहरातील विविध भागांतील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. त्यातच संततधार पावसाने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक भागांत चिखलच चिखल झाल्याने नागरिकांना वाट काढणेही बिकट झाले आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, अभियंता व ठेकेदारांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. (Jalgaon roads in Amalner city wet with rain)
शहरातील ढेकू रोड, पिंपळे रोड, धुळे रस्त्यावरील विविध कॉलन्या, तांबेपुरा, केशवनगर, पाचपावली देवी ते वड चौक, झामी चौक, शिरूड नाका, न्यू प्लॉट आदी भागांत रस्त्यांची मोठी दुरवस्था आहे. यंदा पावसाने जोरदार आगमन केल्याने अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले आहे.
संततधार पावसाने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांना व पादचाऱ्यांना चिखलातून वाट काढणेही अवघड बनले आहे. याकडे पालिका प्रशासन व अभियंत्यांचे दुर्लक्ष आहे. तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
गुलमोहर कॉलनी
ढेकू रस्त्यावरील गुलमोहर कॉलनीत गेल्या २५ वर्षांपासून नागरिकांचा रहिवास आहे. तेथे अनेक भागांत आजही कच्चे रस्ते आहेत. हे रस्ते पक्के काँक्रिटीकरण व्हावे, अशी दीर्घकालीन मागणी कॉलनीवासीयांची आहे. मात्र, याकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ढंकूनही पाहिलेले नाही. पावसाळ्यात गुलमोहर कॉलनीतील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.
ठेकेदाराने या कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकल्याने तेथे चिखलच चिखल होऊन नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय झाली आहे. चिखलामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाट काढावी लागत आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कॉलनीवासीयांनी केली आहे.
पाचपावली देवी चौक
शहरातील पाचपावली चौकापासून ते वड चौकापर्यंतचा रस्ताही अत्यंत खराब झालेेला आहे. पावसामुळे या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यात पाणी तुंबल्याने किरकोळ अपघात होत आहेत. भुयारी गटारींच्या कामांमुळे हे रस्ते खोदण्यात आले होते.
मात्र, हे काम झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने वरवर फक्त मलमपट्टी करून मलिदा लाटला आहे. परिणामी हा रस्ता पहिल्याच पावसात उखडला आहे. हा रस्ता कायमस्वरूपी वर्दळीचा असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडेही पालिकेने लक्ष देवून रस्ता पुन्हा नव्याने दर्जेदार करण्याची गरज आहे. (latest marathi news)
केशवनगरात महिलांचा रास्तारोको
प्रताप तत्वज्ज्ञान केंद्रापासून ते तांबेपुरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची वाताहत झाली आहे. मुरूम टाकल्याने सर्वत्र चिखल झाल्याने महिलांनी दोन दिवसांपूवी डंपर अडवून रास्तारोकोही केला. त्यानंतर प्रशासनाने दोन दिवसांत रस्त्याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, अद्यापही या परिसरात जैसे-थे परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील महिला व नागरिक पालिकेवर मोर्चा नेण्याच्या तयारीत आहेत. या भागात पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना समस्येला तोंड देणे नित्याचेच झाले आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
भुयारी गटारी नावालाच!
अमळनेर शहरात अमृत योजनेतून भुयारी गटारींचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील पक्के रस्ते खोदून चेंबर टाकण्यात आलेत. मात्र, हे काम झाल्यानंतर रस्त्यांचे पुन्हा दर्जेदार व गुणवत्तापूर्व काम करणे गरजेचे होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने नावालाच रस्ते केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसात अनेक भागांत रस्तेच वाहून गेलेले आहेत. परिणामी पाणी तुंबून नागरिकांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. याबाबत चौकशी करून हे रस्ते पुन्हा नव्याने करावेत, अशी मागणी अमळनेकरांकडून होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.