
कधी काळी नाशिक, औरंगाबाद शहरातील विकासाशी तुलना होणारे जळगाव शहर गेल्या दोन- तीन दशकांत इतके मागे गेले की, त्याची अवहेलना आता ‘शहरी खेडं’ अशी होऊ लागलीय. राज्याचे नेते म्हणून जिल्ह्यात अनेकांची ओळख झाली.. पण, जळगाव शहराशी त्यांची नाळच जुळलेली नसल्याने आपल्या शहराची परवड झाली.. कटू असले तरी हे वास्तव आहे, अन् ते सर्वांनी स्वीकारायलाच हवे. (Maharashtra Political News jalgaon Latest Marathi Article)
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मधुकरराव चौधरी, जे.टी. महाजन या दिवंगत नेत्यांसह श्रीमती प्रतिभाताई पाटील व नंतरच्या कालावधीत अरुणभाई गुजराथी, एकनाथ खडसे आणि अलीकडे म्हणजे गेल्या टर्मच्या वेळी ‘एक्स्पोजर’ मिळालेले गिरीश महाजन अशा प्रभूतींची त्या- त्या वेळी राज्याचे नेते म्हणून ओळख निर्माण झाली.
जिल्ह्याचे ठिकाण असल्याने खरेतर या राज्यस्तरीय नेत्यांना जळगाव शहराच्या विकासात योगदान देण्याची मोठी संधी होती. काहींनी त्यासाठी प्रयत्नच केले नाहीत, काहींनी प्रयत्न केलेत; पण ते अपुरे पडले. पण, या सर्वांनी आपापल्या मतदारसंघ अथवा प्रभावाखालच्या क्षेत्रासाठी चांगले काम करुन दाखवले.
पालकमंत्री म्हणूनही या नेत्यांकडे त्या- त्या वेळी जबाबदारी आली. जिल्ह्याचे ते पालक बनले, पण जळगाव शहराचे पालकत्व कुणी स्वीकारले नाही. गेल्या दोन दशकांतील पालकमंत्र्यांच्या नावाची मालिका पाहिली तर लक्ष्मणराव ढोबळे, हसन मुश्रीफ, विजयकुमार गावीत, चंद्रकांत पाटील, पांडुरंग फुंडकर हे तर जिल्ह्याबाहेरचे होते.
जिल्ह्यातील यादी समोर ठेवली तर संजय सावकारे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर ही नावे समोर येतात. पण, या प्रत्येकाचेच मतदारसंघ वेगळे. त्यामुळे या सर्व नावांपैकी कुणाचीही थेट जळगावशी ॲटॅचमेंट कधीही राहिली नाही.
२०१४च्या आधी सुरेशदादा जैन यांचे जळगाव शहरावर एकछत्री वर्चस्व होते. पण, त्यांनी जळगाव शहराच्या विकासाचे व्हीजन ठेवून काही महत्त्वाकांक्षी कामे, प्रकल्प हाती घेतली. काहींत यश आले, तर काही प्रकल्प त्यांच्या अंगाशी आले.
त्यांचा हेतू चांगला होता, पण त्या कामांच्या अंमलबजावणीतील त्रुटी, अनियमिततांचा त्यांना व्यक्तिगत आणि जळगाव शहरालाही मोठा फटका बसला. शिवाय, जैन ज्या- ज्यावेळी मंत्री होते, त्यातील बहुतांश वेळा विरोधी पक्षाचे सरकार होते. त्याचाही नकारात्मक परिणाम झाला.
शिवाय, पालिका व आता महापालिकेचे नेतृत्व म्हणूनही जळगावच्या नि:स्वार्थी विकासाचा विचार कुणी केल्याचे दिसत नाही. आणि या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून जळगावची आजची स्थिती. आता पुन्हा एकदा राज्यातील सत्तेत बदल झालाय.. नव्या मंत्रिमंडळाची प्रतीक्षा आहे.. तशी जळगाव जिल्ह्याला नव्या पालकाचीही प्रतीक्षा आहे. जिल्ह्याचे पालकत्व मिळविणाऱ्या उद्याच्या नेत्याने तरी किमान भकास झालेल्या जळगावच्या विकासाचा ‘विडा’ उचलावा, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.