
गेल्या 15 दिवसांमध्ये केंद्रातील भाजप सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये 100 रुपयांनी वाढ केलीये. कोरोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय,
अमळनेर (जळगाव) : गॅस दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. सिद्धिविनायक कॉलनीत रस्त्यावर चूल पेटवून भाकरी भाजून अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने राज्यभरात केलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी आंदोलन आंदोलन छेडण्यात आले.
गेल्या 15 दिवसांमध्ये केंद्रातील भाजप सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये 100 रुपयांनी वाढ केलीये. कोरोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडलीये. अशातच गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले आहे. महिला आघाडीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रा. रंजना देशमुख व जि. प. सदस्या जयश्री पाटील, जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्ष आशा चावरीया, शहर उपाध्यक्ष अलका पवार, राजश्री पाटील, शहर सचिव आशा शिंदे यांनी चूल पेटवून दर वाढीचा निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दरम्यान यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस दिल्याबद्दलही केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला.
गॅसचे दर कमी होणार का?
सातत्याने वाढणारे गॅसचे दर हे घरातील किचनचे बजेट बिघडवत आहे. पंधरा दिवसात तब्बल शंभर रूपयांची वाढ झाली आहे. आता हे गॅसचे दर कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून, दर कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे