
न्यायालयाने या सर्व नगरसेवकांना गुरुवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाचही नगरसेवक न्यायालयात उपस्थित होते.
जळगाव : येथील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात १६ मार्च २०२० ला न्यायालयात विशेष दावा दाखल करण्यात आला आहे. पाचही नगरसेवक गुरुवारी (ता. १२) जिल्हा न्यायालयात कामकाजासाठी हजर राहिले होते. तक्रारीसंदर्भातील दस्तऐवज मिळावेत, वकील लावण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून या नगरसेवकांनी विनंती केली. पुढील कामकाजासाठी न्यायालयाने २३ नोव्हेंबरची तारीख दिली आहे.
आवश्य वाचा- पीडित तरुणीच्या कुटुंबास आठ लाखाची मदत; पालकमंत्र्यांनी घेतली कुटूंबियांची भेट
घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे व कैलास सोनवणे या पाच नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान, पाचही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी लावून धरली होती. मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्यानंतर प्रकरण न्यायालयात पोचले. मात्र ते सभागृह सदस्य नसल्याने त्यांच्याऐवजी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी १६ मार्चला दावा दाखल केला. लॉकडाउनमुळे कामकाज होऊ शकले नाही. न्यायालयाने या सर्व नगरसेवकांना गुरुवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाचही नगरसेवक न्यायालयात उपस्थित होते.
पुढील कामकाज १३ डिसेंबरला
आमच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दाव्याचे मूळ दस्तऐवज मिळावेत, आम्हाला वकील लावण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती करण्यात आली. त्यावर तक्रार पक्षाचे वकील ॲड. सुधीर कुळकर्णी यांनी आक्षेप घेत ज्या खटल्याच्या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयातून जामीन मिळविला, त्याचे दस्तऐवज आपणाकडे नाहीत. नगरसेवकांच्या अर्जावर कामकाज होऊन न्या. जे. जी. पवार यांच्या न्यायालयाने पुढील कामकाजासाठी १३ डिसेंबर तारीख दिली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे