
शेतकऱ्यांना गव्हाच्या पेरणीला मोठी मदत होणार आहे. तर त्यानंतर पुढील आवश्यकता लक्षात घेऊन दोन आवर्तन सोडावे असा आग्रह पालकमंत्री यांनी घेतल्याने याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
जळगाव : रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन 5 डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
अजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समीतीच्या बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आनंद मोरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एम. एस.आमले, कार्यकारी अभियंता धर्मेद्रकुमार बेहरे, सल्लागार समीतीचे सदस्य प्रशांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, दत्तु ठाकूर, पाचोरा, भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मालेगाव महानगरपालिका, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे व नाशिक, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी यांचेसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
२७ हजार हेक्टर क्षेत्र भिजणार
गिरणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या तीन आवर्तनामुळे रब्बी हंगामास मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून गिरणा प्रकल्पामुळे 23 हजार 905 तर पांझर प्रकल्पामुळे 3 हजार 642 असे एकूण 27 हजार 544 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. शेतकऱ्यांना गव्हाणी पेरणी करावयाची असल्याने पहिले आवर्तन तातडीने सोडण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्यामुळे पाटबंधारे विभागाने येत्या 5 डिसेंबरला पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला.
गहू पेरणीस मदत
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पेरणीला मोठी मदत होणार आहे. तर त्यानंतर पुढील आवश्यकता लक्षात घेऊन दोन आवर्तन सोडावे असा आग्रह पालकमंत्री यांनी घेतल्याने याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
संपादन ः राजेश सोनवणे