सीएमव्ही’ रोगामूळे रावेर पट्यात केळीचे  ७० कोटींचे नुकसान !

सीएमव्ही’ रोगामूळे रावेर पट्यात केळीचे  ७० कोटींचे नुकसान !

रावेर ः केळीवर आलेल्या कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगामुळे तालुक्यात केळीचे सुमारे ७० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे अंतिम अहवाल आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यात रावेर तालुक्यातील ६ हजार ७३२ शेतकऱ्यांचे साडेतीन हजार हेक्टरपेक्षा जास्त केळीचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. 

सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे जुलै महिन्यात लागवड झालेल्या केळीच्या टिश्युकल्चर रोपांवर ‘सीएमव्ही’ या विषाणूजन्य रोगाने आक्रमण केले. यामुळे सुमारे दीड फूट ते तीन फूट वाढलेली केळीची झाडे केळी उत्पादक शेतकऱ्यांना उपटून फेकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. 

पाठपुरावामूळे निघाले आदेश
‘सीएमव्ही’ रोगाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत सुरवातीपासून पाठपुरावा केला गेला. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती अनेकदा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमोर आणली. आमदार शिरीष चौधरी आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय नेला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तीन सप्टेंबरच्या आतच पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नुकसानीचे क्षेत्र अंदाजापेक्षा जास्त आढळून आल्याने आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पंचनाम्याचा अंतिम अहवाल लांबत गेला. 

अंदाजापेक्षा जास्त नुकसान 
जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान ‘सीएमव्ही’ रोगामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्यानंतरही रोगग्रस्त केळी बागांची संख्या वाढत गेली आणि अंदाजापेक्षा देखील मोठे नुकसान झालेले आढळून आले. एकट्या रावेर तालुक्यात 105 गावांमधील शेतकऱ्यांचे साडेतीन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळीबागांचे नुकसान झाले आहे. 
 
अहवालात नुकसानीची रक्कम नाही 
केळीची टिश्यूकल्चर रोपे, नांगरणी, वखरणी, फवारणी, खते, पाणी आणि मजुरी असा मिळून एक केळी खोडासाठी शेतकऱ्यांचा सुमारे 50 रुपये खर्च झाला आहे. प्रत्येक हेक्टरमध्ये ४४०० पेक्षा जास्त केळी रोपांची लागवड होते. पंचनाम्याच्या अंतिम अहवालात किती रुपयांचे नुकसान झाले, याचा मात्र उल्लेख नाही. तथापि, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील रेम्भोटा, रावेर ऐनपूर विवरा बुद्रूक, विवरा खुर्द, नेहता, थेरोळा, अहिरवाडी, पाडळा खुर्द, केऱ्हाळा बुद्रूक, मंगरूळ, लोहारा या गावांमधील केळीचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अहवाल महसूल, कृषी आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाने संयुक्तरीत्या तयार केला आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com