
Jalgaon News : ‘50 खोके एकदम ओक्के’चा हल्लाबोल करणारे आमदार अनिल पाटील पुन्हा आक्रमक?
अमळनेर (जि. जळगाव) : गेल्या अधिवेशनात शिंदे, फडणवीस (Fadnavis) सरकारवर ‘५० खोके एकदम ओक्के’चा हल्लाबोल करण्यात ‘फ्रंटलाइन’वर राहणारे अमळनेर मतदारसंघाचे
आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विधिमंडळात लक्षवेधी प्रवेश करून जोरदार हल्लाबोल केला. (MLA Anil Patil aggressive on cotton issue jalgaon news)
आमदार पाटील यांनी अंगावर कापूस व कांदा परिधान करून जोरदार घोषणाबाजी केल्याने राज्याचे लक्ष वेधून घेतले. 'सरकार प्रचारात व्यस्त','कांदा उत्पादक शेतकरी मात्र उद्ध्वस्त', 'शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो','कांद्याला भाव मिळालाच पाहिजे',
'कापसाला भाव मिळालाच पाहिजे', 'हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे', 'दोन रुपयाचा चेक देणाऱ्या सरकारचा निषेध असो', 'शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या सरकारचा निषेध असो', 'गद्दार सरकार जोमात...शेतकरी मात्र कोमात',
'कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं' अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यावर येत शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात आमदार अनिल पाटील चांगलेच आक्रमक झाले.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
राज्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
सरकारने कापसासाठी निर्यात धोरण तयार करावे व कांद्याला योग्य हमी भाव मिळायला द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांसाठी सदैव आक्रमक - आमदार पाटील
या आंदोलनासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले, की मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असून, शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात याची जाण मला आहे. कापूस कांद्यासह अन्य पिकाला कवडीमोल भाव असल्याने शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे,
असे असताना हे सरकार शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे कोणतेही निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी करावे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ज्या वेळी शेतकरी हिताचा प्रश्न येईल, त्या त्या वेळी असाच आक्रमकपणा या शासनाला आमच्यात दिसेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.