Amalner Marathi Sahitya Sammelan : शमीभा पाटील यांचा तृतीयपंथीयांवरील परिसंवादात सवाल

साहित्य विश्वाचे डोळे आमच्याकडे बघताना बंद का?, असा सवाल कवयित्री-अभ्यासक शमीभा पाटील यांनी उपस्थित केला.
Amalner Marathi Sahitya Sammelan
Amalner Marathi Sahitya Sammelan esakal

Amalner Marathi Sahitya Sammelan : आम्हीही तुमच्यासारखी हाडामासाची माणसं आहोत. मात्र ‘विश्वची माझे घर’ संकल्पनेत आम्ही नव्हतो. विज्ञान कक्षा रुंदावल्या, कादंबरीत एलियन आला. मात्र, प्रस्थापित साहित्यिकांकडून पारलिंगी, द्विलिंगी समुदायाबद्दल लिहलं गेल्याचं आढळत नाही. साहित्य विश्वाचे डोळे आमच्याकडे बघताना बंद का?, असा सवाल कवयित्री-अभ्यासक शमीभा पाटील यांनी उपस्थित केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. (Poet scholar Shamibha Patil raised question why eyes of literary world are closed while looking at us jalgaon news)

साहित्य विश्वाने आमच्याबद्दल कपोलकल्पित मिथ्यावकाश मांडू नयेत. वास्तव मांडण्याचा प्रयत्न व्हावा. वैज्ञानिक पद्धतीचीही मांडणी करावी. परंपरा, सांस्कृतिक जीवन, मानसिक शारीरिक आवेग याचे यथार्थ चित्रण व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या या परिसंवादास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कौतुकासाठी तृतीयपंथी उपस्थित होते. ‘आम्हाला माणूस म्हणून स्वीकारा’ हीच अपेक्षा सहभागींनी व्यक्त केली.

पाटील म्हणाल्या की, संविधानाने सगळे एकच आहोत. त्यामुळे तृतीयस्थानी असलेले तृतीयपंथी नव्हे तर पारलिंगी आहोत. साहित्यात राजन गवस यांनी आराधी, जोगती याविषयी लिहिलं. मात्र त्यावेळी विज्ञान कक्षा रुंदावल्या नव्हत्या त्यामुळे उलट गैरसमज वाढले. ती समज मराठी साहित्य क्षेत्राला विकसित करता आली नाही.

वंचिततेच्याही पलीकडे पाहण्याचा अवकाश विकसित झाला नाही, हे मराठी साहित्याचे अपयश आहे. पितृसत्ताक पद्धतीत बाईच जिथे दुय्यम आहे. तिथे आमच्यासारख्यांना स्वीकारणं तर दूरच. माझ्या अनेक पिढ्या भोगल्या गेल्यात. आमच्यात बदल होण्यासाठी तुम्हाला तुमची दारे खुले करावी लागतील. नाहीतर माझी टाळी हीच माझी पोळी. गरज पडली तर ती तोंडावरही वाजेल.

Amalner Marathi Sahitya Sammelan
Amalner Marathi Sahitya Sammelan : बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रम सादरीकरणात स्वरचित काव्यवाचन

हे कुणी गुन्हेगार नाहीत : खरे

सामाजिक कार्यकर्ते बिंदुमाधव खिरे म्हणाले की, पारलिंगी, उभयलिंगी हे नैसर्गिक आहेत. प्राणी-पक्ष्यातही हे वैविध्य दिसते. वैद्यकीयदृष्ट्या यात बदल करता येतो असे कुणी म्हणाले तर ती फसवणूक ठरेल. यापैकी कुणीही गुन्हेगार नाही आणि कुणासोबतही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा अधिकार त्यांना आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात

अन्याय : वसावे

पारलिंगी स्त्री विजया वसावे म्हणाली, मला पोलिस व्हायचे होते पण भरतीत पारलिंगी पर्यायच नव्हता. मग उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि ट्रान्सजेंडर पर्याय आला. ७२ जणी सहभागी झालो पण अखेर निवड केली नाही. वनरक्षक पदासाठी मला संघर्ष करावा लागतोय. पुरोगामी महाराष्ट्रात हा अन्याय आहे.

द्विलिंगी डॅनियल्ला मॅक्डोन्सा म्हणाल्या, कुठल्याही धर्माकडून आम्हा लोकांना स्वीकारलं गेलं नाही. खर तर माणसाला माणसासारखे वागायला कुठल्या धर्माची गरज पडत नाही. पण धर्म परत लिहायला नाही तर परत वाचायला लागेल. आपल्या जुन्या मानसिकता तोडायला आपल्यालाच पुढे यावं लागेल. मला देवात अर्धनरनारीश्वर दिसतो. मी अबनॉर्मल असते तर मला देवाने निर्माण केलं नसतं.

Amalner Marathi Sahitya Sammelan
Amalner Marathi Sahitya Sammelan : गुलाबी थंडीत काव्य मैफलीने आणली रंगत

रस्त्यावरची टाळी संसदेत

वाजली पाहिजे : देशपांडे

मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी दलित, वंचित साहित्य ताकदीने पुढे आले आणि मुख्य साहित्य प्रवाहाने दखल घेतली. पारलिंगी समुदायाचे साहित्य अद्याप तितके लिहिले गेलेले नाही. अधिक लिहिलं पाहिजे, समाजाने याची दखल घेतली पाहिजे.

या समाजासाठी काम करणारे व्यक्ती शासनव्यवस्थेत जाणं महत्त्वाचं वाटतं. त्यांची रस्त्यावरची टाळी संसदेत वाजली पाहिजे, असे मत मांडले. मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपक पवार यांनी नेटके सूत्रसंचालन केले.

.. तर त्यांना सहाय्य करा

पारलिंगी पुरुष प्रुनीत्त गौडा म्हणाला, पुराणकाळापासून पारलिंगी स्त्री दिसली पण माझं अस्तित्व दिसलंच नाही. माझं आकर्षण कोण हे विचारलं जात नाही. मी तेरा-चौदा वर्षांचा असताना माझा मेंदू, आत्मा पुरुष होत होता आणि शरीराला मासिक पाळी येत होती.

मानसोपचार तज्ज्ञ यांची मदत घेतली पण त्यांना समजलंच नाही. झोपेच्या गोळ्या खाऊन जीवन संपविणार होतो; पण त्याच वेळी बिंदुमाधव खरे भेटले आणि मी मला सापडलो. मानसिकदृष्ट्या कुणी असा संघर्ष करत असेल तर सहाय्य करा.

Amalner Marathi Sahitya Sammelan
Jalgaon News : पाडळसरेचे काम 2025 पर्यंत पूर्ण होणारच : उपमुख्यमंत्री अजित पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com