Latest Marathi News | शेतीची वीज तोडणी तत्काळ थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitran News

Jalgaon News : शेतीची वीज तोडणी तत्काळ थांबवा

अमळनेर : शेतकरी बांधवांच्या तोंडाशी घास आलेला असताना आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी कुणाचेही वीज कनेक्शन कापले जाणार नाही, असे आश्वासन दिले असताना महावितरणकडून सर्रासपणे मतदारसंघातील शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापले जात असल्याने आमदार अनिल पाटील यांनी संतप्त होऊन सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

यासंदर्भात आमदार अनिल पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मागील डीपीडीसीच्या बैठकीत जळगाव जिल्ह्यात कपाशी, बाजरी, ज्वारी, मका यासह इतर पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने विजेअभावी या पिकांचे नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाऊ नये, यासाठी बिलापोटी कुण्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापले जाऊ नये, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. (Stop farm power cuts immediately Jalgaon News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

असे असताना आता याच सरकारच्या अखत्यारितील ‘महावितरण’ने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे आदेश डावलून सर्रासपणे वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरू केल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला असून, आता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे त्यांचेच सरकार शेतकऱ्याला कसे मारता येईल आणि आपली तिजोरी कशी भरता येईल, याचा कट रचतात, ही मोठी शोकांतिका असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवरील हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.

यावर दोन्ही मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कुण्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू असे, आदेश दिले असल्याने कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन कापण्याची कारवाई होणार नाही व शेवटचे बिल देखील टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा दिली जाईल, असे आश्वासित केले होते.

आंदोलनाचा इशारा

आमदार अनिल पाटील यांनी म्हटले आहे, की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पुन्हा विनंती करतो की शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा हा अन्यायकारक प्रकार तत्काळ थांबविण्याचे आदेश महावितरणला देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा शेतकरी बांधवांसोबत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, असा इशारा देखील आमदार पाटील यांनी दिला आहे.